Home » Blog » Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक

0 comments
  • विजय चोरमारे

इतिहास ही वस्तुस्थिती असते, हे खरे असले तरी त्याच इतिहासाची चुकीची किंवा सोयीची मांडणी केली की मोठे घोटाळे होण्याची शक्यता असते. मराठा इतिहासाची अशी चुकीची मांडणी केली गेल्यामुळे आजही त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्ती म्हणजे अर्थातच नव्या आणि खात्रीशीर पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ मांडणी. बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या हस्तकांनी घातलेले घोळ दुरुस्त करून इतिहासाची नवी मांडणी करण्याचे काम करणारे महत्वाचे संशोधक म्हणजे डॉ जयसिंगराव पवार. दादोजी कोंडदेवांसंदर्भाने महत्वाची मांडणी डॉ पवार यांनी केली आणि मराठा इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. काही बखरकार, इतिहासकारांनी मराठा इतिहासावर केलेले लेपन खरवरडून काढून मराठ्यांचा इतिहास लखलखीत करण्याचे काम डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. (Jaysingrao Pawar)

चुकीची प्रांजळपणे कबुली

डॉ. पवार सुरुवातीच्या काळात इतिहासाच्या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके लिहीत असत. अशा सुरुवातीच्या काळातील पुस्तकात त्यांनी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे लिहिले आहे. नंतरच्या काळात त्यांनी आपली चूक प्रांजळपणे मान्य केली. या पाठ्यपुस्तकासाठी संदर्भग्रंथ म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक वापरले होते. त्यामुळे ही चूक झाली आणि ती आपल्या नावावर पडली. पुढे डॉ. पवार स्वतंत्रपणे संशोधनाकडे वळले आणि नवनवी साधने शोधू लागले, तेव्हा संशोधनाअंती त्यांना आपली चूक उमजली. ती त्यांनी दुरुस्त केली. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे त्यांनी सप्रमाण मांडले. हे मांडताना त्यांनी प्रांजळपणे आपली आधीची चूकही मान्य केली आणि नवे संशोधन ठामपणे मांडले. ते मांडल्यामुळे त्यांच्यावर जातीयवादाचे आरोप झाले, परंतु त्यांनी त्याची फिकिर केली नाही.

संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असते. त्यामध्ये भावनेपेक्षा पुरावे महत्वाचे असतात अशी त्यांची धारणा होती. त्याच धारणेने त्यांनी संशोधन कार्य केले. म्हणूनच नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. (Jaysingrao Pawar)

शिवकालीन इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा, संशोधनाचा मुख्य विषय होता. त्यांच्या आस्थेचा विषय होता. याच इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचे चरित्रलेखन त्यांनी केले. मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी. ताराराणींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. त्याहीपुढे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे ते राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्यामध्ये. हे काम त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केले.

तडसर ते कोल्हापूर

सांगली जिल्ह्यातील तडसर हे डॉ. जयसिंगराव पवार यांचे मूळ गाव. शेतकरी कुटुंबातला जन्म. त्यामुळे वडिलोपार्जित शेती करावी असे विचार त्यांच्या मनात यायचे. शेतीतच काही वेगळे प्रयोग करण्याचा ते गंभीरपणे विचार करीत होते. अर्थात त्यांनी ते केले असते तरी तिथेही काही नवे निर्माण केले असते. परंतु त्याहून महत्त्वाचे काम त्यांच्या हातून व्हायचे होते. कोरडवाहू शेती असल्यामुळे विहीर खोदण्याची इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांना ते शक्य झाले नाही. (Jaysingrao Pawar)

शालेय शिक्षण संपल्यानंतर काही घटनांमुळे सगळ्या दिशाच बदलून गेल्या. त्यांची शेती एका श्रीमंत व्यक्तीने विकत घेतली. दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कराडला जाण्याचा विचार करू लागले. त्यासंदर्भात ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांचे एक शिक्षक तिथे आले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी ते कराडऐवजी राजाराम कॉलेजमध्ये आले. साल होते १९५८. राजाराम कॉलेजमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घडण्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सगळ्या मित्रांनी घेतला म्हणून त्यांनीही बी.ए.ला अर्थशास्त्र विषय घेतला, पण त्याची काही गोडी लागेना. ते इतिहासातच रमले.  एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात पहिले आले आणि तेव्हापासूनच संशोधक म्हणून कारकीर्दीची सुरूवात झाली. १९६५ साली त्यांचा इतिहासावरचा पहिला लेख प्रसिध्द झाला. तीच इतिहास संशोधक म्हणून त्यांच्या कारकीर्दीची नांदी ठरली.

राजर्षी शाहूंप्रती कृतज्ञता

शाहू महाराजांनी वसतिगृहे काढली नसती तर आपल्याला शिकता आले नसते, याची कृतज्ञ जाणीव डॉ. पवार यांच्याठायी आहे. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी शाहू महाराजांच्यासंदर्भात काम करण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हे त्याचे मूर्त स्वरूप आहे. शाहूंचे जीवनकार्य आणि त्यांच्या कार्याच्या सर्व पैलूंची ओळख करून देण्याचे काम त्यांनी या बृहद ग्रंथातून केले आहे. हिंदी, इंग्रजीसह अनेक विदेशी भाषांतूनही हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. जगातील सर्व भाषांमधून हा ग्रंथ अनुवादित व्हावा आणि शाहूंच्या कार्याची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले. शाहू, शाहू आणि शाहू …. असे शाहूविचारांनी झपाटलेले झाड म्हणता येईल डॉ. जयसिंगराव पवार यांना. शाहूप्रेमापोटीच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालकपद अवघ्या एक रुपया मानधनावर स्वीकारले. त्या केंद्रामार्फत शाहूंशी संबंधित अनेक महत्त्वाची पुस्तके नव्याने प्रकाशित केली. (Jaysingrao Pawar)

राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा तसा अलीकडचा काळ आहे. म्हणजे १९२२ मध्ये शाहू महाराजांचे देहावसान झाले. एवढ्या अलीकडच्या काळातील इतिहासामध्येही तत्कालीन इतिहास संशोधकांनी अनेक घोळ घालून ठेवले होते. शाहू महाराजांच्यासंदर्भात अनेक कपोकल्पित कथा पसरवून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव यांच्यासारख्या संशोधकांनी शाहूंच्या कार्याकडे नव्याने लक्ष वेधले आणि त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. डॉ. संगवे यांनी शाहूंच्या कागदपत्रांच्या खंडांचे संपादन करून कोल्हापूरच्या राजाने किती सर्वस्पर्शी आणि कल्याणकारी कार्य केले आहे, हे जगभर पोहोचवले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहूंच्या सामाजिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि त्यादृष्टीकोनातून त्यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

वर्तमानाशी धागा (Jaysingrao Pawar)

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असे नाही. डॉ. पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच ते वर्तमानातील राजकीय, सामाजिक घटना-घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असत. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचे लेखन ते करीत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करीत. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करीत. (Jaysingrao Pawar)

 वयाची ऐंशी पार केल्यानंतरही त्यांनी कधी ज्येष्ठत्वाचा आव आणला नाही, की उपदेशकाची भूमिका घेतली नाहीत. नव्या पिढीकडून नव्या गोष्टी मनःपूर्वक ऐकून घेत. आपल्याहून पन्नास वर्षे लहान असलेल्यांशीही मैत्रीपूर्ण संवाद साधत. सामाजिक क्षेत्रातील बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा करत. राजकारणातल्या तत्त्वहीन गोष्टींबद्दल व्यथित होत. फॅसिस्ट प्रवृत्ती, जातीय-धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींबद्दल संताप व्यक्त करीत. आणि या सगळ्याला शाहू विचारांचे अधिष्ठान असे. छत्रपती शिवाजी महाराज-महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत. त्यांचे मोठेपण सांगता सांगताच त्याचा वर्तमानाशी धागा जोडून वैचारिक मशागतीचे काम करीत असत.

डॉ. पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते, म्हणजे चांगल्या कामाच्या पाठिशी उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव. कोणत्याही चांगल्या कामाच्या, चांगल्या व्यक्तिच्या पाठिशी ते आपली ताकद उभी करत. अशा ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहात नसत. त्यातही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे कार्य असेल तर ती आपली जबाबदारी आहे, असे मानून ते कार्यकर्त्याच्या भूमिकेत उभे राहत. (Jaysingrao Pawar)

शिवचरित्राचा संकल्प (Jaysingrao Pawar)

पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्लेषणात्मक इतिहास लिहिण्याचा संकल्प केला होता. दरम्यानच्या काळात मोगलमर्दिनी ताराराणी हा चरित्रग्रंथ साकारला. त्याआधी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले. पंचगंगातीरी… हे त्यांचे आत्मचरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत नाही, तर तत्कालीन काळाचा दस्तावेज आहे. एका संशोधकाचा आणि त्याच्या पुढच्या मागच्या काळाचा प्रवास त्यातून उलगडला आहे. (Jaysingrao Pawar)

डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवचरित्र लिहावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी व्यक्त केली होती. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवासमोर त्यांनी तसा संकल्प केला होता. शिवकालीन इतिहासातील चुकीची पाने फाडण्याचे काम त्यांनी त्याआधीही केले होते. त्यामुळे डॉ. जयसिंगराव पवार यांचे शिवचरित्र महाराष्ट्राला छत्रपतींचे लखलखीत दर्शन घडवेल, असे वाटत होते. महाराष्ट्राला शिवकालीन इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, असे वाटत होते. त्याचे ब-यापैकी काम त्यांनी केले होते. ते पूर्ण करण्यासाठी ते जिद्दीने आजारावर मात करून बाहेर येतील, असे वाटत होते. परंतु दुर्दैवाने त्याआधीच त्यांची झुंज संपली. आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा होण्याच्या आधीच त्यांनी निरोप घेतला. शिवचरित्रही अपुरे राहिले. अर्थात त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार या तेवढ्याच तोलामोलाच्या संशोधक आहेत. त्यांचे शिवचरित्राचे अपूर्ण काम त्या पूर्ण करतील, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरणार नाही.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00