- विजय चोरमारे
अजितदादा पवार यांच्यावर लिहावंसं खूप तीव्रतेनं वाटत होतं. पण लिहायला मन धजावत नव्हतं. कुणाही जवळच्या माणसाच्या जाण्यानंतर त्यावर लगेच नाही व्यक्त होता येत. त्यासाठी वेळ जावा लागतो. त्यातही पुन्हा अजितदादांच्या जाण्यामुळं ज्या वेदना झाल्या, त्याहून अधिक वेदनादायी घटना नंतर घडत गेल्या. त्यासंदर्भातही लिहायचं आहे. पण घटना इतक्या वेगानं घडताहेत की, किती आणि कायकाय लिहायचं, हा प्रश्न आहे. मी माझ्या महाराष्ट्र दिनमान चॅनलवर `अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रानं काय गमावलंय?`, असा एक व्हिडिओ केला तेवढाच. बाकी जवळचं माणूस गेल्यानंतर धंदेवाईक वृत्तीनं स्वतःच्या मंचावर काही चिवडत बसणं मला प्रशस्त वाटत नाही. पण पत्रकार म्हणून अनेक वृत्तवाहिन्यांवर ज्या ज्या वेळी कुणी विचारलं त्या त्या वेळी उपलब्धतेनुसार व्यक्त झालो. मग ते फोनोच्या माध्यमातून असेल, स्वतंत्र चर्चेच्या कार्यक्रमात असेल किंवा मुलाखतींच्या माध्यमातून.
अजितदादांच्यावर लिहायचं आहे. सविस्तर लिहायचं आहे. पण त्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल. अजितदादांचे माझे संबंध वेगळे होते. अजितदादांचा मी कठोर टीकाकार होतो. तसं तर बहुतेक पत्रकारांनी अजितदादांच्या विरोधात लिहिलं आहे. त्यांची टिंगलटवाळी केली आहे. पण त्यांच्या राजकीय कारकीर्दीत माझ्याइतकं कठोर टीकात्मक आणि सातत्यपूर्ण कुणी लिहिलं नसेल. त्याचवेळी अजितदादांच्या चांगल्या कामांची दखल अन्य कुणी घेतलेली दिसणार नाही. मी वेळोवेळी ती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांशी माझे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकारण जाणणा-यांना माहीत असतं की पवारांचं कुणी जवळचं नसतं. तरी मी शरद पवारांचा जवळचा असल्याचा एक समज संबंधित वर्तुळात आहे. मी अजितदादांच्यावर लेखनातून, टीव्हीवरील चर्चेच्या कार्यक्रमातून थेट आणि कठोर टीका करतो, हेही त्यांना माहीत होतं. पण एकदा विश्वासाचं नातं तयार झाल्यावर त्यांनी अशी कुठलीही गोष्ट मनात ठेवली नव्हती. मी त्यांच्या तीन सविस्तर मुलाखती घेतल्या आहेत. प्रत्येक मुलाखत सुमारे तासाभराची असून त्या यूट्यूबवर आहेत. त्यातूनही काही गोष्टी दिसतात. त्यापलीकडे आम्ही काहीवेळा स्वतंत्रपणे भेटलोय, प्रत्येकवेळी ते अनेक गोष्टी विश्वासानं बोलले.
व्यक्तिगत पातळीवरचं हे सगळं मुद्दाम लिहिण्याचं कारण की, इथली अनेक मंडळी कुठलातरी एखादा धागा पकडून अर्धवटपणे व्यक्त होत असतात. अशांची दखल घेण्याचं कारण नसतं, मी ती घेतही नाही. पण काही शहाण्यासुरत्या वाटणा-या, परिचित मंडळींचाही बाणा नको तेव्हा उफाळून येत असतो. त्यामुळं हे नमनाला घडाभर तेल घालावं लागलं.
गेल्या चार दिवसांतल्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर माझ्यासारख्याच्या मनात एक प्रश्न तीव्रतेने निर्माण झाला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राला गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही. घड्याळ आणि तुतारी चिन्हाचा. अजित पवारांचा आणि शरद पवारांचा. हे दोन्ही पक्ष. महाराष्ट्राच्या राजकारणात या पक्षांची आज गरज आहे का? आजच्या घडीची या दोन्ही पक्षांची अवस्था पाहिल्यानंतर मनापासून वाटतं, की हे दोन्ही पक्ष नामशेष झाले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काडीचाही फरक पडणार नाही. उलट त्यातून महाराष्ट्राचे झाले तर भलेच होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ चिन्हावरचा पक्ष
पहिल्यांदा विचार करू घड्याळाच्या चिन्हावरील पक्षाचा. अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा. आताच्या घडीला या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार आहेत. पीयूष गोय़ल यांच्याकडून एक खडा टाकून प्रफुल्ल पटेल यांनी चाचपणी करून बघितली. पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यावर अनेक पातळ्यांवर सारवासारव करावी लागली.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या दोन्ही भूमिकांमधून त्या पक्ष कसा चालवतील त्यावर पक्षाचे भवितव्य राहील. अजितदादांशी तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. पण भविष्यात त्या ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांच्यासारख्या नेत्या बनतात की राबडीदेवी यांच्या मार्गाने जातात, हे पाहावे लागेल. त्याचे उत्तर काळच देईल. पण आताच्या घडीला त्यांचा पक्ष भाजपच्या छत्रछायेखाली आहे. प्रफुल्ल पटेर, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षातले कारभारी शरीराने राष्ट्रवादीत आणि मनाने भाजपमध्ये आहेत. अजितदादांना सगळी कल्पना होती. आपल्या पक्षातील सोळा आमदार फुटून निघण्याच्या तयारीत असल्याचे कळाल्यावर अजितदादांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्यावर विश्वास टाकून शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवारही जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे केले. यापेक्षा त्यासाठीचा अन्य कुठला पुरावा असू शकतो? म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडे जे काही उरले सुरले लढणारे ग्रामीण भागातले कार्यकर्ते होते, ते त्यांनी अजितदादांच्या पक्षात पाठवून दिलेत. आणि ज्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे होते, ते अजितदादाही दुर्दैवानं सोडून गेले.
अजितदादांची गरज का होती?
अजितदादा भाजपसोबत सत्तेत असले तरी त्यांनी भूमिका सोडली नव्हती. विचारधारेतलं वेगळेपण त्यांनी टिकवून ठेवलं होतं. अजितदादा किंवा त्यांच्या पक्षाचा आमदार नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यावर रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात माथा टेकायला गेला नाही. हे नोंद करून ठेवायला हवं. अजितदादांचं नेतृत्व आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्राला गरज होती, ती याच भूमिकेसाठी. नजिकच्या काळात भाजप विरोधात ते संघर्षासाठी उभे ठाकू शकले असते. महापालिका निवडणुकीत त्यांनी त्याची चुणूक दाखवली होती. त्यांच्या नेतृत्वाची आणि पक्षाचीही महाराष्ट्राला गरज होती. आता अजितदादा नाहीत. त्यांची भूमिकाही नाही. जी काही मंडळी आहेत ती इशारा होताच, नमस्ते सदा वत्सले… साठी सज्ज आहेत. आता पक्षाची सूत्रे प्रफुल्ल पटेलांच्या हाती असणार आहेत. पर्यायाने त्याचा रिमोट अमित शाह यांच्या हाती असेल. असा पक्ष महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणासाठी भाजपपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण भाजप उघड भूमिका घेऊन चालतोय. भाजपच्या सावलीत रमलेला पक्ष अजितदादांसारखे नेतृत्व नसेल तर वेगळी भूमिका घेऊ शकणार नाही. तोंडदेखली नावं घेणं आणि भूमिका पुढं नेणं, यातला फरक लक्षात घ्यायला हवा. पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही चौकडी भाजपच्या विचारांच्या विरोधात ब्र काढू शकणार नाहीत. अजितदादांचा पाठिंबा असल्यामुळेच अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारखे प्रवक्ते भाजप, हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात थेटपणे बोलत होते. आता त्यांना ती मुभा नसेल.
आणि भाजपचीच भूमिका पुढे न्यायची असेल तर भाजप आहे. पुरोगामी किंवा बहुजन बुरखा पांघरून भाजपची भूमिका पुढे नेणा-या पक्षाची महाराष्ट्राला गरज नाही. अर्थात हा पक्ष नेते, कार्यकर्ते यांच्यापुरता आणि निवडणुका लढवण्यापुरता राहील. तेवढंच त्याचं अस्तित्व असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस – तुतारी चिन्हावरचा पक्ष
दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा. सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. जयंत पाटील हे राज्यपातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. आणि शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना या पक्षाला मिळालेल्या दहापैकी आठ जागी विजय मिळाला. नवव्या शशिकांत शिंदे यांच्या जागेला तुतारीच्या दुस-या चिन्हामुळे फटका बसला. आणि दहावी जागा एकनाथ खडसेंच्या अवसानघातामुळे गेली. नाहीतर पक्षाचा स्ट्राइकरेट शंभर टक्के असता. शरद पवार यांची राजकीय ताकद दाखवणारा हा अखेरचा निकाल होता. विधानसभेला चित्र पालटलं. आणि पुन्हा शरद पवार यांचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू झाली. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनी तर त्यावर शिक्कामोर्तब केलं. इथं सगळ्यांकडून एक गल्लत केली जाते. शरद पवारांच्या पक्षाला यश मिळालं म्हणजे पवारांची ताकद टिकून आहे. आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला की त्यांची ताकद कमी झाली, असं मानलं जातं. निवडणुकीतील यशापयश हे शरद पवार यांच्या मूल्यमापनाचं अत्यंत चुकीचं परिमाण आहे, हे एवढ्या वर्षांनंतर तरी लक्षात यायला पाहिजे. पण लक्षात येऊनही काहीजण मुद्दाम ते लक्षात घेत नाहीत.
शरद पवारांभोवती राजकारण
“हम जहाँ खड़े होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है…” हा अमिताभ बच्चनचा कालिया चित्रपटातला डायलॉग आपण ऐकलाय. त्याचप्रमाणं शरद पवार जिथं उभे राहतात किंवा बसलेले असतात त्यांच्या अवतीभवती महाराष्ट्राचं आणि काहीवेळा देशाचं राजकारण घिरट्या घालतं हे लक्षात घ्यायला हवं. शरद पवारांचे विश्वासू सहकारी मोठ्या संख्येनं त्यांना सोडून गेले. आता आहेत त्यातल्याही कुणाचा पवारांच्या राजकारणाला काडीचा उपयोग नाही. आणि आता पवारांचा आपल्याला उपयोग राहिलेला नाही, म्हणून बहुतेकांचा विलिनीकरणासाठी विलाप चालला आहे. शरद पवार काय आहेत, हे नीरा नदीच्या काठावर उभे राहिल्यावर कळतं. एप्रिलमध्ये ते राज्यसभेतून निवृत्त होताहेत. त्यानंतर ते संसदेत जाऊ शकत नाही, असं म्हटलं जातं. परंतु शरद पवारांना जर संसदेत जायचं असेल तर ते कुठूनही म्हणजे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमधूनही जाऊ शकतात. त्यासाठी महाराष्ट्राचं बंधन त्यांना नाही. त्यामुळं त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करण्याचं कारण नाही. प्रश्न आहे तो त्यांच्या पक्षात असलेल्या अन्य नेत्यांचा.
पक्ष की व्हाट्सअप ग्रूप?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात राजकीय पक्षापेक्षा एखाद्या व्हाट्सअप ग्रूपचे स्वरूप आले आहे. सुप्रिया सुळे यांच्यापासून जयंत पाटलांपर्यंत यच्चयावत सगळे नेते केवळ सोशल नेटवर्किंग करताना दिसताहेत. आपापल्या राजकीय गढ्या सुरक्षित ठेवण्यापलीकडे कुणी पाहात नाही. राजकारणात विरोधी पक्षात राहताना संघर्ष करायचा असतो हे सगळे विसरून गेले आहेत. त्याचमुळे अजितदादांच्या पक्षात विलिनीकरण करून सत्तेचे चारदोन तुकडे मिळतील, याची आस सगळ्यांना लागून राहिली होती. अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षातले नेते हिंग लावून विचारत नसताना ही मंडळी मात्र लाचारासारखी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती असा राग आळवताना दिसतात.
आता परिस्थिती बदलली आहे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला भूमिका बदलायला पाहिजे, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. एकटे शरद पवार अपवाद आहेत. अजितदादांचे अस्थिविसर्जन झाल्यानंतर शरद पवार बाहेर पडले. ते सत्तेच्या सोहळ्यासाठी नव्हे. लोकांच्या प्रश्नांसाठी. शरद पवारांचं राजकारणात सहा दशकं उभं राहण्याचं बलस्थान हेच आहे. हे त्यांच्या लेकीलाही उमजलेलं नाही आणि त्यांचा वारसा उगाळणा-या बाकीच्या मंडळींनाही. सुप्रिया सुळे यांना राजकारणापेक्षा सोशल नेटवर्किंग महत्त्वाचे वाटते. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांपासून नरेंद्र मोदींपर्यंत कुणाचेही कौतुकाचे पूल बांधताना त्यांना संकोच वाटत नाही. आपण पक्षाच्या कार्याध्यक्ष आहोत आणि शऱद पवार यांच्या प्रकृतीच्या मर्यादा असताना आपल्यावर काहीएक जबाबदारी आहे, याचं काडीचं भान त्यांना नाही. बारामती लोकसभेच्या पलीकडचा महाराष्ट्र आणि संसदेतल्या महिला मंडळापलीडचं विश्व त्यांना दिसत नाही. संसदेच्या मंचावर त्यांची क्षमता अनेकदा दिसून आली आहे, परंतु ती महाराष्ट्राच्या राजकारणात वापरण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसून आलेली नाही. एनजीओसदृश्य राजकारण कुणाच्याच फायद्याचं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल तो दिवस त्यांच्या पक्षासाठीचा सुदिन असेल.
जयंत पाटील यांच्या मर्यादा
जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा ग्राफ २०१९पर्यंत एका विशिष्ट गतीने उंचावत होता. परंतु तो २०१९मध्ये जिथे होता, तिथेच थांबला. गेल्या सहा वर्षांत ते जिथल्या तिथं आहेत. या काळात त्यांचं एकही गंभीर भाषण ऐकिवात नाही. कितीही गंभीर विषय असला तरी त्यावर उपरोधाचं पाणी ओतून ते स्वतःचं हसं करून घेतात. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यानं सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं. पण गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सगळीकडं त्यांना काड्या करण्यात, गटबाजी करण्यात अधिक रस असतो. एका टोळक्याच्या पलीकडं ते जात नाहीत. पक्षातल्या निष्क्रियांना संरक्षण देण्यात त्यांनी अलीकडच्या काळात आपली ताकद वापरली. पक्ष पुढं जाण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि महिला या शाखा अत्यंत महत्त्वाच्या असतात. गेल्या दोन वर्षांत या तिन्ही शाखा मृतवत आहेत. जयंत पाटील यांच्या कृपाछत्राखालची मंडळी तिथं आहेत. त्यांना हलवलं तर जयंत पाटील दुखावतील म्हणून त्यांना धक्का लावला जात नाही. शरद पवारही जयंत पाटील यांच्या जणू उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले वाटतात. आणि जयंत पाटील त्याचा फायदा घेत राहतात.
महाराष्ट्राचं राजकारण महिलाकेंद्री बनलं असताना शरद पवारांच्या महिला शाखेइतकी निष्क्रिय आणि मृतवत शाखा देशात कुठं आढळणार नाही. महिलांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बळावर ज्या शरद पवारांचं राजकारण उभं आहे, त्या पक्षाच्या महिला शाखेची ही अवस्था शोचनीय आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असताना ही अवस्था असणं ही तर एखाद्या पक्षाची गुन्हेगारी स्वरुपाची हेळसांड म्हणावी लागेल. सगळ्या पातळीवरून हे मुद्दाम केलं जातंय, का असाही प्रश्न पडतो. अर्थात शरद पवारांना निवृत्तीचे आणि बाकीच्यांना सत्तेच्या उबेला जाण्याचे वेध लागले असताना हळुहळू पक्ष व्हेंटिलेटरवर नेण्याचे हे नियोजनपूर्वक प्रयत्न वाटतात. अजितदादा फुटून निघाल्यानंतर शरद पवारांनी सातत्याने सांगितलं की, मी तरुण नेतृत्व उभे करणार. पण रोहित पवार आण रोहित पाटील या दोघांच्यापलीकडंही तरुण आहेत, हे त्यांना कुणी सांगितलेलं दिसत नाही.
शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका निष्ठावान आणि लढाऊ कार्यकर्त्याकडं पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. परंतु त्यांना काम करू दिलं जात नाही. जयंत पाटलांना दुखावायचं नाही. आणि रोहित पवारांना काही विचारायचं नाही. शिवाय जोडीला तीन-चार दिव्यांग शाखा. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याला कितीही वाटलं तरी तो कसा काय पक्ष चालवू शकेल? शशिकांत शिंदे यांचे हातपाय बांधून त्यांना शऱद पवारांनी धावण्याच्या शर्यतीत उतरवलंय. कठीण आहे एकूणच सगळं.
निष्क्रिय खासदारांची पलटन
गेले काही महिने विलिनीकरणाच्या पलीकडे आणखी एक चर्चा होत होती, ती म्हणजे, शरद पवारांच्या पक्षातले खासदार अजितदादांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये जाऊ इच्छितात. शरद पवारांच्या खासदारांपैकी सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे सोडले तर सगळा आनंदी आनंद आहे. निलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासारखे लोक खासदार असले काय, ते शरद पवारांच्या पक्षात असले काय किंवा आणखी कुठे असले म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे? असले नग गोळा करून शरद पवारांना कुठली क्रांती घडवायची आहे? आणि असली मंडळी सोडून गेली म्हणून काय मोठं आभाळ कोसळणार आहे?
खरेतर शरद पवार यांनी आता दावणीचा दोर सोडावा. जित्राबांना उधळायचं असेल तिकडं उधळू दे. जितेंद्र आव्हाडासारख्यांची अडचण करू नये. कुणाला घड्याळाच्या राष्ट्रवादीत जायचं असेल, कुणाला भाजपमध्ये जायचं असेल, कुणाला शिवसेनेत जायचं असेल त्यांना जाऊ दे. ज्यांना कुणाला भाजपशी संघर्ष करायचा असेल ते काँग्रेसमध्ये जातील. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं असेल तर तेही जाऊदे.
महाराष्ट्र धर्माचा विसर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा महाराष्ट्र धर्म हा त्याचा गाभा होता. शरद पवारांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, की आपल्या पक्षाच्या नावामध्ये काँग्रेस आहे. आपली परंपरा काँग्रेसची आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वृत्ती असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीच्या इशा-यावर काम करणं कठीण होतं. त्याला तत्कालीन कारणं आणि अनेक पदर होते. पण मूळ कारण पवारांची स्वतंत्र वृत्ती हेच होतं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला होता. स्वतंत्र पक्ष काढताना त्यांनी काँग्रेसची विचारधारा प्रमाण मानली. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा, महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारा प्रादेशिक पक्ष असंच त्याचं स्वरुप होतं. ज्या लोकांना काँग्रेसच्या समुद्रात निभाव लागणं कठीण वाटत होतं, त्यांना महाराष्ट्रव्यापी राष्ट्रवादी सोयीचा वाटत होता. या पक्षाचे नेते शरद पवार हे महाराष्ट्रातील प्रगतीशील प्रवाहाचे आधारस्तंभ राहिले. हा पक्ष भाजपविरोधात संघर्ष करीत राहिला. धर्मवादी राजकारणाचा प्रतिवाद करीत राहिला. महाराष्ट्र धर्मासाठी झगडत राहिला. ती महाराष्ट्राची गरज होती. आता त्या पक्षाच्या दोन्ही तुकड्यांनी आपली मूळ भूमिका टाकून दिली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टिने त्यांचा उपयोग संपला आहे. त्यांचे औचित्य उरलेले नाही. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचे औचित्य उऱत नाही तेव्हा अशी गोष्ट टिकली काय किंवा नामशेष झाली काय त्याने कुणाला काहीच फरक पडत नाही.