मुंबई : विशेष प्रतिनिधी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला असला तरी खरा निकाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच सांगितला होता. दहशतवादाला कोणताही धर्म व रंगही नसतो पण भाजपा त्याला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) केली. (Congress alleges BJP)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या खटल्याचा निकाल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता, हे यानिमित्ताने खेदाने नमूद करावेसे वाटते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, रंगही नसतो, पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. (Congress alleges BJP)
खोटारडेपणा व दुटप्पीपणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. मालेगावच्या निकालावर प्रतिक्रीया देताना त्यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. एका घटनेला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे नैतिकता व शपथेला धरून नाही. फडणवीस यांनी नैतिक व संवैधानिक मूल्ये पाळली नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम आणि लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून त्याला ‘क्रीडा मंत्रालय’ देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा टोला लगावला.
सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्यामुळे ते चुकीचीच कामे करणार. सामाजिक न्याय विभाग वा आदिवासी विभागाचा निधी हा कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही, पण सरकार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असून संविधानाची पायमल्ली करत आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. (Congress alleges BJP)
जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांची चर्चा होत होती. पण ज्या पक्षात जायचे त्यांच्याशी योग्य सौदा काही होत नव्हता आता सौदा झाल्याने ते गेले असतील. याला गळती म्हणणे चुकीचे ठरेल, काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही, ५०-५० वर्ष एकाच कुटुंबात पक्षाची पदे दिली गेली आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असेही ते म्हणाले.