कोल्हापूर : प्रतिनिधी : डिजिटल अरेस्ट ची भिती दाखवून निवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला. कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिका मिना मुरलीधर डोंगरे (वय ७५ रा.सम्राट नगर,कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
गंडा घालणाऱ्या संशयितांनी सोशल मिडियावर व्हिडिओ कॉल करुन प्रा. डोंगरे यांना आम्ही ट्राय डिपाटॅमेंटमधून बोलतोय, मनी लॅन्डींग ॲन्ड इन्व्हेस्टेमेंट फ्रॉड गुन्हयात तुमच्या आधार कार्डचा वापर झाला आहे. माहिम येथील एका बॅँकेत ६ कोटी रुपये जमा झाले आहेत. कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्यावर तक्रार दाखल आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भिती दाखवली होती. (Three and half crores fraud)
१८ एप्रिल, २०२५ रोजी दुपारी दीड वाजता त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. “आम्ही ट्राय डिपार्टमेंटमधून बोलतोय,तुमचा फोन दोन तासांमध्ये बंद होणार आहे. याबाबत डोंगरे यांनी कारण विचारल्यानंतर मनी लॅन्डींग इन्व्हेस्टमेंट फ्रॉड गुन्ह्यात पैशाची देवाण घेवाण करणाऱ्यांनी तुमच्या आधार कार्डचा वापर करून माहिम येथील एका बॅँकेच्या खात्यात सहा कोटी जमा केले आहेत. त्याचा आम्ही तपास करीत आहोत”. असे संभाषण भामट्यांनी केले होते.
त्यानंतर आम्ही पोलिस अधिकारी असल्याचे सांगून तिघांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांनी मीना डोंगरे यांना त्यांच्या बॅँक खात्याची माहिती घेतली.त्यांनी आपले बॅँक खाते नंबर सांगून पैसे पाठवण्यास सांगितले. डोंगरे यांनी पैसे पाठवणार नाही, तुम्ही फसवत आहात असे सांगितल्यावर ते तिघेही त्यांच्यावर भडकले. तुम्हाला अटक करण्यासाठी पोलिसांची गाडी पाठवतो, याचे शुटींग करून सोशल मिडीयावर व्हायरल करतो, अशी भितीही त्यांनी डोंगरे यांना दाखवली. याबाबत घरात कोणाला काही सांगू नका, घरातच बसून रहा असे सांगितले. व्हिडीओ कॉन्स्फरन्सीव्दारे संशयीतांनी डोंगरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गणवेशधारी अधिकारी, त्यांच्या कार्यालयातील लगबग, अटक करून आणलेले संशयित आरोपी, त्यांच्याकडे सुरू असलेली चौकशी असे वातावरण निर्माण केले होते. (Three and half crores fraud)
डोंगरे यांनी संशयितांच्या खात्यावर आर.टी.जी.एस व एनएफटीव्दारे कधी २५ लाख ५० लाख,२० लाख अशा प्रकारे ३ कोटी ५७ लाख २३ हजार रुपये पाठवले. पण तरीही संशयीत अटकेची भिती दाखवून डोगरे यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते. खात्यावरील पैसे संपल्यानंतर डोंगरे या भानावर आल्या. त्यांनी हा प्रकार आपल्या पतीला व डॉक्टर मुलीस सांगितला. कुटुंबियांनाही या घटनेमुळ धक्का बसला.
त्यांनी २७ मे रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांनी अज्ञात तिघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.