जमीर काझी : मुंबई : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित दादा हे कधीही भोंदूबाबाच्या नादाला लागले नाहीत. अपघातापूर्वी त्यांच्या देवगिरी निवासस्थानाजवळ काहींनी अघोरी पूजा केले असल्याचे सांगितले जात असून हे सर्व भयानक आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात याचे २ सप्टेंबर ते ३१ जानेवारीपर्यंतचे सीडीआर तपासावेत. अजित दादाच्या घातपाताचे धागेदोरे त्याच्यापर्यत पोहोचतील,असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
शिर्डी (अहिल्यानगर) येथे रविवारी त्यांनी साई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना राज्यात चर्चेचा विषय असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना थेट प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले,’ गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीत गुप्त बैठका घेणारे अधिकारी नेमके कोण होते ? प्रशासकीय अधिकारी भांडे -पाटील आणि पत्नी, त्यांच्या कन्येसोबत आर्थिक व्यवहार झाले का ? याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे. भोंदू खरातच्या कथित साम्राज्यामागे नेमकी कोणाची साथ होती ? दोन हजार कोटींची मालमत्ता कशी उभी राहिली ? याचा तपास व्हावा, असे त्यांनी मागणी केली. या प्रकरणात तब्बल ५०० व्हिडिओ असल्याचा दावा करत, त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या महिलांचे संबंध होते का? हे तपासातून समोर येईल”, असेही त्यांनी सांगितले.
“कोणत्याही सरकारमधील मंत्री किंवा अधिकारी या कुकर्मात सहभागी असतील. तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. बाबाच्या पापाचे भागीदार कोणीही सुटणार नाहीत”, असा इशारा देऊन मिटकरी म्हणाले,’ अजित पवारांनी ज्या-ज्या लोकांवर प्रेम केले ते लोक आता शांत का आहेत ? त्यांना कोणी धाकात ठेवलं आहे का ? ४० वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजित पवारांच्या मृत्यूबाबत एक महिन्यांच्या अर्थसंकल्पात चर्चा झाली नाही. जे आमदार या विषयावर बोलत नाहीत, त्यांच्या घरातील लोक आणि पुढील पिढी त्यांना जाब विचारेल. तसेच अजित पवार यांच्याविरोधात रचलेल्या षड्यंत्राचे परिणाम लवकरच महाराष्ट्रात दिसतील,” असा दावा करून मिटकरी म्हणाले,” अजितदादां निवासस्थान देवगिरीजवळ अघोरी पूजा करण्यात आली होती. २५ मार्चला अधिवेशनाचं सूप वाजेल. गेली काही दिवस अशोक खरात वृत्तामुळे अजित पवारांच्या मृत्यूबाबतचा विषय मागे पडत आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत अल्पकालीन चर्चा अधिवेशनात होईल, अशी आशा आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार असून त्यांना उद्या भेटणार आहे.
ते म्हणाले,”महाराष्ट्राच्या संतपरंपरेत अघोरी प्रथांना थारा नाही. कुणी करंगळ्या कापल्या, याचा तपास एआयटी करणार आहे. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींनी सांगितले आहे. आश्रमात एवढा अघोरी प्रकार घडत असताना पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. त्याच्या आश्रमासाठी ९७ लाख लिटर पाणी आरक्षित होते. त्यामुळे हा बाबा साधासुद्धा नव्हता. विर्दभाचा अनुशेष निघेल, एवढी एका बाबाची प्रॉपर्टी आहे. भांडे -पाटील यांच्यासारखे वरिष्ठ अधिकारी त्याच्या गळाला लागले होते. अधिकाऱ्याच्या बायकांचेदेखील व्हिडिओ आहेत का याचाही तपास झाला पाहिजे.”अशी मागणी केली.