मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे वयाच्या ८९ वर्षी मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस श्वसनाचा त्रास होता. म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. हॉस्पिटलमधून त्यांना घरी आणले होते. आज सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, पुत्र सनी, बॉबी आणि अभय देओल आणि दोन मुली असून दुसरी पत्नी हेमामालिनी यांना ईशा व अहाना या कन्या व नातवंडे असा परिवार आहे. धर्मेंद्र यांच्या रुपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक देखणा, दणकट आणि फायटिंग मास्टर अभिनेता मिळाला होता. (Dharmendra passes away)
पंजाबमध्ये जन्म
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना जिल्हयातील नसराली गावात झाला. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा मनोरंजन सृष्टीशी संबंध नव्हता. पण धर्मेंद्र यांना सिनेमा पाहण्याची आवड होती. याचदरम्यान त्यांनी सुरैय्या यांचा दिल्लगी हा सिनेमा बघितला. हा सिनेमा त्यांना एवढा भावला की, आपणही सिनेमात काम करायचा असा निर्णय त्यांनी घेतला. मात्र चित्रपटसृ्ष्टीत कसा प्रवेश करायचा हे देखील त्यांना माहीत नव्हते. मात्र ‘नई प्रतिभा की खोज’ या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि त्यांचे नशीबच बदलले. या स्पर्धेमुळे त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली.
उंचपुरे देखणे रुप,आकर्षक देहयष्टी आणि भारदस्त आवाज आणि त्याला साजेसा पंजाबी अॅटीट्यूड यामुळे १९६० साली’दिल भी तेरा, हम भी तेरे’ या सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर शोला और शबनम,अनपढ, बंदिनी यासारखे सिनेमे त्यांनी केले. (Dharmendra passes away)
‘फूल और पत्थर’ मुळे ओळख
पण धर्मेंद्र यांना खरी ओळख दिली ती १९६६ मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’ या सिनेमाने. या सिनेमाला, धर्मेंद्रला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले आणि एका रात्रीत धर्मेंद्र स्टार झाले. त्यानंतर त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे ‘ही मेन ऑफ इंडियन सिनेमा’ असे नाव त्यांना देण्यात आले. सिनेमातील त्यांचे व्यक्तीमत्व, संवादफेक, एक्शन, पडद्यावर त्यांचा सहज वावर बघून प्रेक्षकांनी धर्मेंद्र यांना अक्षरश डोक्यावर घेतले. (Dharmendra passes away)
त्यानंतर धर्मेंद्र यांनी एकामागोमाग एक हिट सिनेमे दिले. ज्यात शोले, चुपके चुपके,अनुपमा, सत्यकाम, राजा जानी, यादो की बारात यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांमुळे धर्मेंद्र यासारखा अष्टपैलू अभिनेता बॉलीवूडला गवसला होता. आपल्या कार्यकीर्दीत धर्मेंद्र यांनी फक्त एक्शनच सिनेमेच केले नाहीत तर कॉमेडी आणि रामॅटिंक हिरो म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत सहा दशकांहूनही अधिक काळ राज्य केलेल्या धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक सिनेमे केले आहेत. (Dharmendra passes away)