जमीर काझी : नागपूर : मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्याबाबत दोन्ही पक्षाशी सकारात्मक वाटाघाटी सुरु आहेत,जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
आगामी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली. त्याबाबत आज पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण ते म्हणाले की , आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूकासंदर्भात कशा प्रकारे पुढे जायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपण स्वत: अशी आमची संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. महानगरपालिका निवडणूका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये महायुती व्हायला हवी अशा अपेक्षा बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्व महानगरपालिका निवडणूकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करुन युतीचा फॉर्म्युला ठरविण्याचे ठरले आहे. (The elections will be fought as a Mahayuti)
महायुतीत घटकपक्षांचा समावेश
महापालिका निवडणूकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करुन पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जात आहे. असे सांगताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कालच्या बैठकीमध्येही मुंबई व अन्य महानगरपालिका निवडणूका या युती म्हणून लढल्या पाहिजे असा सकारात्मक विचार करण्यात आला. महायुतीबाबत आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील सर्व निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते वेळोवेळी निर्णय घेतील त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणूकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल. महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस, आरपीआय आणि अन्य घटकपक्षांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. (The elections will be fought as a Mahayuti)
मुंबईत नवाब मलिकांच्या नेतृत्वाला विरोध
राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकासाठी पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. त्याला भाजपाचा विरोध आहे. त्यामुळे जर मलिक यांच्याकडेच पक्षाने नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यास विरोध केला जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. (The elections will be fought as a Mahayuti)