मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील भाजप-महायुती सरकारमधील सहा मंत्री आणि दोन आमदारांना बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली. (Thackeray group’s demand)
राज्यपालांकडे अशी मागणी करताना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यातील सरकारच्या कारभारात नैतिकता राहिलेली नाही असा आरोप केला. जबाबदारी आणि प्रशासन स्वायत्तेचा बोजवारा उडाला आहे. सरकारमधील मंत्री जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. आमदार उद्दामपणाचे वर्तन करत आहेत. मंत्र्यांकडून अपारदर्शक व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, नितेश राणे, योगेश कदम, संजय राठोड यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अर्जुन खोतकर, संजय गायकवाड यांच्यावरही कारवाई करण्याची मागणीही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली आहे. (Thackeray group’s demand)
शिष्टमंडळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार ॲड. अनिल परब, आमदार महेश सावंत, आमदार नितीन देशमुख, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, सुप्रदा फातर्पेकर, साईनाथ दुर्गे, पराग लिलाधर डाके, विठ्ठलराव गायकवाड, माजी आमदार विनोद घोसाळकर, विशाखा राऊत, भाऊ कोरगांवकर यांचा समावेश होता. (Thackeray group’s demand)