कोल्हापूर : प्रतिनिधी : रोहिणी नक्षत्राच्या सुरवातीला बऱ्याच वर्षाने पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधूदुर्ग, कोकण किनारपट्टीत वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर अत्यंत कमी पावसाचा भाग असलेल्या बारामती, फलटण, पंढरपूर, माळशिरस, सोलापूरला पावसाने झोडपले असून पहिल्याच पावसात भीमा नदीला पूर आला आहे. नीरा नदीचा कालवा फुटल्याने बारामती शहरात पाणी घुसले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Heavy rain)
सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यातील बहुताश जोरदारपणे झोडपून काढल्याने मोठी दाणादाण उडाली. मुंबईत जोरदार वाऱ्यासह झालेल्या कोसळधारेमुळे दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपगरात अनेक ठिकाणी व रेल्वे रुळावर पाणी साचले होते. राज्याचे प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या आकाशवाणी गेटकडील प्रवेशद्वारासह दादर, सायन, अंधेरी सब वे, भायखळा आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून मोठा गाजावाजा करून करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली. दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली.
अतिवृष्टीमुळे मुंबईची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या लोकल, तसेच रस्त्यावरील आणि मेट्रोची वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.भूमिगत मेट्रो-३ मध्ये पाणी शिरल्याने कामाचा दर्जा उघड झाला आहे.(Heavy rain)
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची व झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक बंद पडली. तर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सुरु झालेली संततधार दुपारी अडीचपर्यंत कायम होती. त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. मात्र तरीही रात्री उशिरापर्यत लोकल उशीराने धावत होत्या. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडीही कायम होती.
मुंबईतील भुयारी मेट्रोचे पहिल्याच पावसात तीनतेरा
वरळी परिसरातील भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद करण्यात आले. आरे जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो-३ मार्गिका नुकतीच पूर्ण क्षमतेने सुरु झाली होती. वरळी ते मरोळ या मार्गिकेचे राज्य सरकारकडून अवघ्या आ दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात होते. मात्र अत्रे स्थानकात सोमवारी पाणी शिरले. ह अत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून खाली कोसळत होते. छतातून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांमुळे संपूर्ण स्थानक जलमय झाले होते. मेट्रो ट्रेनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे ॲक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ चे आचार्य अत्रे स्थानक अक्षरश: जलमय झाले होते.(Heavy rain)
पहिल्याच पावसाने मेट्रोची ही दुरावस्था उघडी पाडल्याने मेट्रो प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याठिकाणी वृत्तांकन करण्यास बंदी केली. त्यांना अत्रे स्थानकातून हाकलून लावण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पत्रकारांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. असे स्पष्टीकरण दिले.
पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले. पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले होते. एवढेच नव्हे पाणी शिरल्याने स्थानकातील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.(Heavy rain)
मस्जिद स्टेशनवर पाणी साचल्याने वडाळा आणि सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी साडेदहा वाजल्यापासून थांबवण्यात आली. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत एका तासात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईतील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सायन सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, बिंदू माधव जंक्शन वरळी, फाईव्ह गार्डन्स माटुंगा या सखल भागात पाणी साचले आहे. नरिमन पॉईंटला एका तासात १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ए वॉर्ड ऑफिस ८६ मि.मी., कुलाबा पंपिंग स्टेशन ८३, महानगरपालिका मुख्यालय ८०, कुलाबा अग्निशमन केंद्र ७७, मलबार हिलला ६३ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
अजित पवारांची पहाटेपासून पूराची पाहणी
बारामती आणि इंदापूर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने मोठा पूर आला आहे. नीरा नदीचा कालवा फुटून बारामती शहरात पाणी घुसले आहे. इंदापूरातील १० गावामध्ये १०० घरात पाणी शिरले असून जिल्हा प्रशासनाने त्याना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. इंदापूरच्या आसपासच्या भागात १३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बारामतीमध्ये अनेक घरात पाणी घुसले आहे. तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाणी आले आहे. उप मुख्यमंत्री अजित पहाटे पाच वाजल्यापासून पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात फिरती करत आहेत. दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण तालुक्याला पावसाने झोडपले आहे. ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत.