मोदींचा भाजप फासिस्ट, हुकूमशाहीवादी आहे अशी टीका अनेकदा होते. पण तो नेमके काय करतो आहे, याबाबत अनेकांना स्पष्टता नसते. राहुल गांधी न घाबरता मोदींवर थेट टीका करतात म्हणून किंवा ते गांधी घराण्याचे वारस आहेत म्हणून भाजप त्यांचा द्वेष करतो, असे अनेकांना वाटते. विरोधकांचे तर सोडाच, पण राहुल यांच्या अंगावर भुंकत जाणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांनाही आपली हीच भूमिका आहे असे वाटत असण्याची शक्यता आहे… (Rahul Gandhi vs BJP)
- राजेंद्र साठे
१९५७ च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. लालकृष्ण अडवानी आधी संघाचे व नंतर जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. अडवानींना वाजपेयी यांचे सहायक म्हणून नियुक्त करण्यात आले. १९६० मध्ये अडवानी ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या नियतकालिकामध्ये चित्रपट परीक्षणे लिहू लागले. त्यांना दिल्लीत राहायला घर नव्हते. पण तेव्हाच्या नेहरु सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी घरे देण्याची योजना काढली होती. त्यात अडवानींना आरकेपुरम भागात घर मिळाले. या काळात जनसंघ हा नेहरुंचा प्रखर टीकाकार होता.
चीन युद्धामुळे तर जनसंघाला मोठेच निमित्त मिळाले होते. तरीही अडवानी यांचे घर सरकारने कधी काढून वगैरे घेतले नाही. वाजपेयी आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत चांगली भाषणे करीत. त्यामुळे खुश्चेव्ह भारत भेटीवर आला असताना त्याच्या पार्टीत नेहरुंनी वाजपेयींना मुद्दाम निमंत्रित केले होते, हा किस्सा तर प्रसिद्धच आहे. (Rahul Gandhi vs BJP)
लोकशाही मूल्यांचा चुराडा
फेब्रुवारीच्या सुरुवातीला राहुल गांधी यांच्यावरून संसदेत रणकंदन झाले. चीनचे रणगाडे चालून येत असताना जनरल मनोज नरवणे यांना ‘जो उचित समझो, वो करो तुम्हाला योग्य वाटेल ते करा,’ असे सांगून नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेण्यापासून पळ काढला, असा हल्लाबोल राहुल यांनी केला. दुसऱ्या दिवशी एपस्टिन फाइल्सचा विषय निघाला. या भानगडीत नाव असल्यानेच मोदींनी ट्रम्प यांच्यापुढे शरणागती पत्करली, असा थेट आरोप त्यांनी केला. यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली. पण त्याने याबाबत स्पष्ट खुलासा केला नाही.
उलट, नेहरु व इंदिरा गांधी यांच्या तथाकथित खासगी भानगडींची चर्चा करून काँग्रेसवरच टीका केली. नंतर आणखी कहर केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांना निवडणुकीला आजन्म बंदी घालावी, असा ठराव लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला. आता याबाबत मार्च महिन्यात चर्चा होणार असून, त्यावेळी पुन्हा नव्याने हंगामा होईल.
नेहरू-इंदिरा-राजीव यांच्या काँग्रेसच्या कारभाराबाबत पन्नास इतर आक्षेप घेता येतील. पण लोकशाहीतील विरोध आणि विरोधक यांचे सन्मान राखण्याचे मूल्य काँग्रेसने मान्य केले होते. नेत्यांच्या स्वभावानुसार त्यात कमीअधिक झाले असेल. पण व्यापक लोकशाही चौकट काँग्रेसने कायम मान्य केली, इथे प्रस्थापित केली व देशातील जनतेलाही त्याचौकटीची सवय लावली हे कोणीही नाकारू शकत नाही. अडवानींच्या वर दिलेल्या उदाहरणावरून तेच दिसते. (आणीबाणी हा एक अपघात व अपवाद होता व त्याबाबतही काँग्रेस नेत्यांनी पुरेशी दिलगिरी व्यक्त केलेली आहे.) पूर्वी जनसंघ व नंतर भाजप म्हणून संघ परिवाराने या मूल्यांचा पुरेपूर फायदा घेतला आणि आज त्यांचे सध्याचे सत्तेतले कारभारी तीच मूल्ये नष्ट करीत आहेत. (Rahul Gandhi vs BJP)
हिंदूशाहीचे वळण
मोदींचा भाजप फासिस्ट, हुकूमशाहीवादी आहे अशी टीका अनेकदा होते. पण तो नेमके काय करतो आहे, याबाबत अनेकांना स्पष्टता नसते. राहुल गांधी हे न घाबरता मोदींवर थेट टीका करतात म्हणून किंवा ते गांधी घराण्याचे वारस आहेत म्हणून भाजप त्यांचा द्वेष करतो, असे अनेकांना वाटते. विरोधकांचे तर सोडाच, पण राहुल यांच्या अंगावर कुत्र्यांप्रमाणे भुंकत जाणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांनाही आपली हीच भूमिका आहे, असे वाटत असण्याची शक्यता आहे. (Rahul Gandhi vs BJP)
प्रत्यक्षात भाजपला खास भारतीय पद्धतीची फासिस्ट हिंदूशाही लागू करायची आहे. या हिंदूशाहीमध्ये लोकशाहीचा बाह्य सांगाडा कायम राहील. एकीकडे निवडणूक, न्यायदान वगैरेसारख्या प्रक्रिया चालू आहेत, असा आभास चालू ठेवायचा, दुसरीकडे या प्रक्रियांवरचा लोकांचा विश्वास उडेल याची काळजी घ्यायची, असे यातले प्रयत्न आहेत. बाकी सर्व पक्ष असहाय, अनैतिक आहेत, अशा स्थितीत भाजप या एकमेव तारणहाराच्या मदतीने वाटचाल केली तरच खरी लोकशाही चालू राहील अशी विचित्र श्रध्दा जनतेमध्ये रुजवायची अशी ही खटपट आहे. भाजप नावाच्या ताकदवान व नैतिक सत्ताधीशांना मदत करणे हे न्यायालयांचे कर्तव्यच आहे असे जणू लोकांना वाटू लागले आहे. यातून भारतातील राज्यव्यवस्थेला या हिंदूशाहीकडे नेण्यात भाजप जवळपास यशस्वी झाला आहे.
भाजपचा स्लो मोशन उपक्रम
हे सर्व कसे चालू आहे याची आपल्या महाराष्ट्रातली काही उदाहरणे पाहू. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ तर अजित पवार यांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. त्यावेळी विरोधकांमध्ये उत्साह संचारला. काही काळाने अजितदादांचे नेते व कार्यकर्ते शरद पवारांकडे परत येतील, अशी भाकिते बहुसंख्य नेते व पत्रकार करू लागले. पण विधानसभेला अक्षरशः जादू झाली. महाविकास आघाडीचा पालापाचोळा झाला. अजित पवार गटाला ४१ तर शरद पवार गटाला अवघ्या १० जागा मिळाल्या. (Rahul Gandhi vs BJP)
त्यानंतर क्रमाक्रमाने शरद पवार गटाचे अवसान खलास झाले. महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून आपण महाराष्ट्रात काहीही उलटफेर करू शकतो हा शरद पवारांचा आत्मविश्वास खतम झाला. त्यांच्याकडचे आमदार व खासदार डळमळीत झाले. त्याचाच परिणाम म्हणून अजित पवार असतानाच महापालिका निवडणुकीत एकत्र निवडणुका लढल्या गेल्या. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने तर शरद पवारांसह सगळे जण सैरभैर झाले व विलीनीकरणाचा जोराने आग्रह धरू लागले. विशेष म्हणजे, भाजपने मात्र याला आपला विरोध असल्याचा आव आणला आहे. (Rahul Gandhi vs BJP)
शरद पवारांचा भाजपविरोध नेस्तनाबूत
म्हणजे गंमत पाहा. मुळात २०११-१२ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करून अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेला सुरुंग लावण्यात आला. नंतर त्यांना २०१९ आणि २०२३ मध्ये ते सत्तेसाठी सहज विकत घेता येऊ शकणारे नेते असल्याचे दाखवून उरलीसुरली प्रतिमा खलास करण्यात आली. त्यावेळी कोणत्याही स्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती. पण त्यांच्या घरातले नेते आणि बहुसंख्य कार्यकर्तेच त्यांच्यासोबत नाहीत हे दाखवून देण्यात आले. विधानसभा निवडणुकांनंतर तर खुद्द शरद पवारही आपल्या भूमिकेपासून ढळू आणि पळू लागले. त्याचे मराठी जनतेसमोर नीट प्रदर्शन होईल, याची काळजी घेण्यात आली.
पालिका निवडणुकीत शरद पवारांशी युती करण्याआधी अजितदादांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती, हे इथे नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजे, याची योजना भाजपच्या संमतीनेच ठरवली गेली होती. शरद पवारांचा भाजपविरोध कसा नेस्तनाबूत झाला, हे स्लो मोशनमध्ये जनतेला दिसत राहणे भाजपसाठी आवश्यक होते. आता गेल्या काही दिवसात पवारांचा भाजप-विरोध किती तकलादू होता, हे भाजपने उघडे पाडले आहे व त्यांचे पुरेसे वस्त्रहरण केल्यानंतरच विलीनीकरणाला हिरवा कंदील दिला जाईल असे दिसते.
फासिस्ट पद्धतीचे संमोहन
हे केवळ सत्तेच्या जोरावर विरोधकांना खलास करणे किंवा आपल्या बाजूने वळवणे इतकेच नाही. भाजपला विरोध करणाऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या मागे कोणतीही नैतिक ताकद नाही व त्यामुळेच ते पराभूत होणे अपरिहार्य आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा हा सर्व उपक्रम आहे. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपवालेच त्यांना जवळ घेतात आणि तरीही भाजपला याचा डाग लागत नाही किंवा मतदारांच्या मनातली भाजप, मोदी, देवेंद्र यांची प्रतिमा काळवंडत नाही याचे अनेकांना आश्चर्य वाटते. हे फासिस्ट पद्धतीचे संमोहन आहेच. पण ते तेवढेच नाही.
सत्ता असल्यामुळे भाजप ताकदवान आहे असे नसून, भाजपकडे नैतिक ताकद असल्याने तो ताकदवान आहे, त्यामुळेच त्याला सतत सत्ता मिळते हे आम जनतेच्या मनावर ठसवण्यात आतापर्यंत तरी मोदी आणि मंडळी चांगलीच यशस्वी झाली आहेत. ती नैतिकता ठसवण्यासाठी नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांना कुटुंबाचे पाश कसे नाहीत, ते कसे धार्मिक आहेत, राजा हा उपभोगशून्य स्वामी असल्याचा साक्षात अवतार कसे आहेत अशा प्रतिमा सतत प्रसूत केल्या जात असतात. नरेंद्र मोदींच्या धार्मिकतेचे प्रदर्शन हे हिंदू धर्मियांना सुखावण्यापुरते मर्यादित नसते. तर हे धार्मिक आहेत म्हणजेच उच्च नैतिक मूल्यवाले आहेतच, अशी प्रतिमा रुढ करण्याचा तो प्रयत्न असतो.
वरपासून खालपर्यंत तोच अजेंडा
केवळ वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमा निर्मितीत नव्हे तर खालच्या पातळीवरही बिबिध प्रकारे हा खेळ खेळला जात असतो. गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून एका झटक्यात अननुभवी आमदारांना मंत्री करणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश देणे, शिवराजसिंगांचे पंख छाटणे, बावनकुळे किंवा विनोद तावडे यांचे तिकिट कापणे असे प्रकारही यात सामील असतात. परवा नागपूर महापालिकेत नव्याने निवडून आलेले भाजप नगरसेवक शपथ घ्यायला गेले, तर पहिल्यांदा त्या सर्वांचे कोऱ्या कागदावर राजीनामे घेण्यात आले. भल्या भल्या नेत्यांवरही पक्षाचा जबरदस्त अंकुश आहे व ते हूं का चूं करू शकत नाहीत, हे सामान्य जनतेला सुखावणारे असते. पापी लोकांना देव शिक्षा करतो अशी श्रध्दा असावी तशी लोकांची भाजपवर श्रध्दा तयार होते.
दुसऱ्या बाजूने, भाजपला विरोध करणारे हे कसलीही तत्त्वे न मानणारे आणि सत्तेसाठी लाचार आहेत, हे वेगवेगळ्या रीतीने दाखवण्यात येते. पवार ते नीतीशकुमार ते मुलायम ते चंद्राबाबू अशी असंख्य उदाहरणे समोर आहेत. आज काहींना हे म्हणणे धाडसाचे वा मूर्खपणाचे वाटेल. पण भविष्यात एखाद्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांनाही नीतिभ्रष्ट म्हणून दाखवण्याची संधी भाजप साधू शकेल. ममता एकेकाळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात सामील होत्या, हे विसरून चालणार नाही. (Rahul Gandhi vs BJP)
तमाम विरोधकांना नीतिभ्रष्ट व स्वतःला नैतिकतेचा पुतळा म्हणून पेश करणाऱ्या भाजपला नडू शकतील व त्याची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतील असे दोनच जण आहेत. एक आहेत डावे कम्युनिस्ट पक्ष. पण त्यांची ताकद खूपच मर्यादित आहे. त्यांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. दुसरे आहेत राहुल गांधी. त्यांचाच संघर्ष आपण सध्या पाहतो आहोत.
राहुल यांचा एकला संघर्ष
राहुल गांधी यांच्यामागे गांधी-नेहरुंच्या काँग्रेसची पुण्याई आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे भाजपला शक्य झालेले नाही. राहुल यांच्याविरुद्धचे भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेले सर्व खटले हे सावरकर किंवा संघ किंवा मोदींवर टीका केल्याबद्दलचे आहेत. नॅशनल हेरॉल्डसारखी प्रकरणे न्यायालयांनी उडवून लावली आहेत. राहुल कोणत्याही स्थितीत मोदी किंवा भाजपशी दोस्ती तर सोडाच, समेटही करण्याची शक्यता नाही. विरोधकांकडे नैतिक ताकद नाही, या भाजपच्या सध्याच्या मुख्य सूत्राची हवाच राहुल काढून घेत आहेत. (Rahul Gandhi vs BJP)
राहुल यांच्या नेतृत्वाच्या अनेक मर्यादा आहेत. त्यांच्याकडे इंदिरा गांधी यांच्यासारखा मुरब्बीपणा, बाजी उलटवण्याचे कौशल्य नाही. सत्ता राबवण्याचा अनुभव नसल्याने त्यांचा विरोध हा अनेकदा अकादमिक किंवा एनजीओ धर्तीचा वाटतो. संघटना उभारणीमध्ये त्यांना रसच नाही, अशीही काहीशी स्थिती आहे. इतरही अनेक बाबी आहेत. पण भाजपला असलेला त्यांचा तात्त्विक व राजकीय विरोध हा शंभर टक्के प्रामाणिक आहे, हे दिवसेंदिवस जनतेमध्ये अधिक ठसत चालले आहे, हे भाजपसाठी चिंतेचे आहे. म्हणूनच भाजप त्यांच्यावर विखारी त्वेषाने व चहू दिशांनी हल्ले चढवत आहे. एकाच वेळी त्यांना कारस्थानी सोरोसचे भारतातील एजंट ठरवणे, दुसरीकडे अबोध बालक ठरवणे, तिसरीकडे अपयशी नेता ठरवणे असे पर्याय चाचपले जात आहेत.
राहुलची भूमिका जयप्रकाश नारायणांसारखी
राहुल हे काँग्रेसच्या नावाने ही लढाई लढत असले, तरी काँग्रेसवाले त्यांच्यासोबत आहेत असा भरवसा देता येत नाही. भलेभले नेते कधी भाजपपुढे दबून जातील वा तडजोडी करतील, हे सांगता येत नाही. शशी थरुर यांचे उदाहरण सर्वांच्या डोळ्यापुढे आहे. रेवंत रेड्डी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचे प्रेम सत्तेवर अधिक असते वेळोवेळी दिसले आहे. या स्थितीत, (काँग्रेसवाल्यांना हे म्हणणे आवडणार नाही, पण एका अर्थाने) इंदिरा गांधींविरोधातल्या जयप्रकाश नारायणांसारखी भूमिका राहुल बजावत आहेत. काँग्रेस संघटनेच्या डोक्यावरून थेट जनतेच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करीत असल्यासारखा त्यांचा पवित्रा आहे. म्हणूनच ते संघटना बांधण्याबाबत काहीसे उदासीन असावेत.
पण राहुल यांचा सामना अत्यंत पाताळयंत्री व सर्वसत्ताधीश भाजपशी आहे. त्याहूनही अधिक तो फितूर जनतेशी आहे. लाडकी बहीण योजना असो की मतदानासाठी मिळणारे रोख पैसे… हे सगळे घेऊन खुद्द जनताही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात सामील होऊ लागली आहे. (Rahul Gandhi vs BJP)
या जनतेला कसे जागे करायचे हा ‘एका अकेल्या` पुढचा खरा प्रश्न आहे.
(राजेंद्र साठे हे ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत. ‘सरदार वल्लभभाई पटेल : एक सडेतोड व्यक्तिमत्त्व’ (मनोविकास) हे त्यांचे अलीकडचे प्रकाशित झालेले अनुवादित पुस्तक आहे.)
संपर्क: satherajendra@gmail.com