- नगांगोम सूरज
इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या मध्यवर्ती ख्वैरांबंद बाजारात, रस्त्याच्या कोपऱ्यावर आपली जागा पकडून बसतात. त्यांच्या डोक्यावर ना शेड, ना आसरा — फक्त उन्हापासून बचावासाठी एक छोटी छत्री. (Imphal’s women’s market struggling)
मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये दुपारपर्यंत तापमान नियमितपणे ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाते आणि सकाळपासून दुपारपर्यंत त्या उन्हात बसून राहतात. गेल्या २१ वर्षांपासून त्या हेच काम करत आहेत. पण आता परिस्थिती अधिक कठीण होत चालली आहे.
“संपूर्ण दिवस उन्हात बसल्यानंतर शरीर थकून जाते, अंगात शक्ती राहत नाही आणि रात्री झोपही लागत नाही. त्यामुळे संध्याकाळी मला ओआरएस आणि इलेक्ट्रोलाइट पेये घ्यावी लागतात. मुलांकडून अंग रगडून घ्यावे लागते,” असे त्यांनी सांगितले.
“पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच करावे लागते. मी लवकर पोहोचले नाही, तर दुसरी विक्रेती माझी जागा घेते.” असे त्या सांगतात. (Imphal’s women’s market struggling)
चोंगथाम मणी यांच्यासारख्या शेकडो महिला विक्रेती ख्वैरांबंद इमा कैथेल — जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना महिलांचा बाजार — आणि त्याच्या आसपासच्या रस्त्यांवर आपला उदरनिर्वाह करतात.
सामान्य दिवशी त्या ६०० ते ८०० रुपये कमावतात. चांगला दिवस असेल, तर १५०० ते २००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पण हिंसाचार आणि संघर्षाने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता “सामान्य दिवस” ही दुर्मिळ गोष्ट बनली आहे. (Imphal’s women’s market struggling)
उष्णता नेहमीच असायची, पण आता उष्णतेची तीव्रता वाढली आहे. आणि सततच्या हिंसाचाराचा त्रास सहन करण्याची ताकद उरलेली नाही.
वाढत्या तापमानाची आकडेवारी
मणिपूर सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल संचालनालयाच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत राज्यात गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये नोनी जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले.
२०१३ मध्ये वार्षिक कमाल सरासरी तापमान ३४.७ अंश होते, ते २०२४ मध्ये ३५.७ अंशांपर्यंत पोहोचले.
मणिपूर राज्य हवामान कृती आराखड्यानुसार २०३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत तापमानात आणखी किमान १.७ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. मागील शंभर वर्षांत राज्यातील किमान तापमान १.७ अंशांनी, तर कमाल तापमान १.५ अंशांनी वाढले आहे.
या वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम विक्रेत्यांच्या मालावर होत आहे. भाज्या, मासे आणि इतर नाशवंत वस्तू लवकर खराब होऊ लागल्या आहेत.
थौबल बाबू बाजारातील ५८ वर्षीय खांबी गेली ४० वर्षे ख्वैरांबंद बाजारात भाज्या विकतात. त्या सांगतात : “घाऊक बाजारातून आणलेल्या भाज्या फार वेगाने सुकतात किंवा कुजतात. त्यामुळे त्यांची किंमत पटकन घसरते.”
नांबोल येथील ६१ वर्षीय सनातोंबी सांगतात की, उष्णतेमुळे भाज्या सुकणे आणि कुजणे यामुळे त्यांना अनेकदा ५० टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागतो.
मासे विकणाऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. (Imphal’s women’s market struggling)

लेईमापोकपाम येथील ४० वर्षीय देबला ओक्रम म्हणतात : “तापमान वाढल्यामुळे मासे टिकवण्यासाठी बर्फावर अधिक खर्च करावा लागतो.”
“आणि एकदा बर्फ संपला की सगळे संपते. अनेकदा एवढा तोटा होतो की शेवटी खराब झालेले मासे शेजाऱ्यांना मोफत द्यावे लागतात.”
मासे विक्री करणा-या युमनाम लैकाई येथील ५४ वर्षीय प्रभितराणी सांगतात :
“अनेकदा मला ५० टक्क्यांपेक्षा अधिक तोट्यात मासे विकावे लागतात. कधी कधी पूर्ण नुकसान होते.”
पाणी पिणेही महाग (Imphal’s women’s market struggling)
इम्फाळ पश्चिममधील पात्सोई गावातील ६१ वर्षीय लँडहोनी आपल्या छोट्या किचन गार्डनमधील भाज्या विकतात.
चांगली विक्री होईल, त्यादिवशी त्या ३०० ते ४०० रुपये कमावतात. त्यातील ६० रुपये रोजच्या प्रवासावर खर्च होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आणखी २० ते ३० रुपये बाटलीबंद पाण्यावर खर्च करावे लागतात.
त्या म्हणतात : “आमच्यासारख्या लोकांसाठी, जे दिवसभरात फक्त ३००-४०० रुपये कमावतात, पाणी आणि प्रवासावर जादाचा खर्च करणे खूप कठीण असते.”
स्वच्छतागृह वापरण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. इमा कैथेल किंवा सार्वजनिक शौचालयात लघवीसाठी ५ रुपये आणि शौचालयासाठी १० रुपये द्यावे लागतात. (Imphal’s women’s market struggling)
“सरकारने मोफत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या किंवा नळ उभारले, तर केवळ विक्रेत्यांनाच नव्हे तर सर्व बाहेर काम करणाऱ्या कामगारांना मदत होईल,” असे त्या म्हणतात.
सध्या ज्या रस्त्यांवर महिला बसतात, तिथे ना पाण्याची व्यवस्था आहे ना सावलीसाठी शेड.
या प्रतिनिधीने ज्या महिलांशी संवाद साधला, त्यापैकी जवळपास सर्वांनी डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, अशक्तपणा, पायात गोळे येणे, उष्णतेमुळे पुरळ येणे आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी सांगितल्या.
संघर्षाच्या छायेतले जीवन
या आधीच कठीण परिस्थितीत ३ मे २०२३ रोजी सुरू झालेल्या मणिपूरमधील संघर्षाने आणखी संकट निर्माण केले. (Imphal’s women’s market struggling)
अचानक लागू होणारे कर्फ्यू, इंटरनेट बंदी, संप आणि आंदोलन ही आता खोऱ्यातील जिल्ह्यांतील रोजची बाब झाली आहे. अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता लागू होतात आणि दिवसन्दिवस चालतात.
अशा वेळी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आधीच खरेदी केलेला माल पडून राहतो — आणि उन्हाळ्यात तो लवकर खराब होतो.
सनातोंबी सांगतात :“अचानक कर्फ्यू लागल्यामुळे सलग काही दिवस बाजार बंद राहिला आणि माझ्या सगळ्या भाज्या खराब झाल्या.”
देबला ओक्रम सांगतात की, माशांच्या विक्रेत्यांसाठी दोन्ही संकटे एकत्र येतात. “अचानक बाजार बंद झाल्यामुळे बर्फ मिळाला नाही आणि त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला.”
शतकांपासूनचा इतिहास
इमा कैथेलभोवतालचा परिसर हा शतकानुशतके महिला विक्रेत्यांच्या व्यापार, श्रम आणि राजकीय प्रतिकाराचा केंद्रबिंदू राहिला आहे.
इमा कैथेलमधील महिलांच्या संघटनांपैकी ‘लुकमई सेलुप’च्या सचिव असेम निर्मला यांच्या मते, हा बाजार १६व्या शतकात राजा खगेम्बा यांच्या काळात स्थापन झाला.
आज या बाजारातील तीन मुख्य इमारतींमध्ये ४,००० पेक्षा अधिक महिला विक्रेत्या आहेत. (Imphal’s women’s market struggling)
१९०४ आणि १९३९ मधील ‘नुपी लान’ अर्थात महिलांच्या युद्धांमध्ये या बाजाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
१९०४ मध्ये स्थानिक पुरुषांकडून सक्तीची विनामूल्य मजुरी पुन्हा सुरू करण्याच्या ब्रिटिश निर्णयाविरोधात महिलांनी आंदोलन केले.
१९३९ मध्ये राज्यात तांदळाची टंचाई निर्माण करणाऱ्या मोठ्या प्रमाणातील तांदूळ निर्यातीविरोधात महिलांनी संघर्ष उभारला.
“ही आंदोलन मणिपुरी महिलांच्या धैर्य, एकजूट आणि राजकीय सामर्थ्याचे प्रतीक आहेत,” असे असेम निर्मला म्हणतात.
आजही इमा कैथेल हा इम्फाळचा आर्थिक आणि सामाजिक केंद्रबिंदू आहे. येथे महिला भाज्या, फळे, सुकामासे, हातमाग उत्पादने, मसाले आणि घरगुती वस्तू विकतात.
मात्र संघर्षामुळे बाजाराचे स्वरूप बदलले आहे.
“हजारो लोक विस्थापित झाले आहेत. अनेकांनी उपजीविका गमावली आहे. सततचे संप, कर्फ्यू आणि अस्थिरतेमुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांचेही जीवन विस्कळीत झाले आहे,” असे त्या सांगतात.
बाजारातही असमानता
इमा कैथेलच्या मुख्य इमारतींमध्ये कायमस्वरूपी स्टॉल असलेल्या महिलांना किमान काही सुविधा मिळतात — पंखे, हवा खेळती राहण्याची व्यवस्था, प्रकाश आणि स्वच्छतागृहे.
इम्फाळ महानगरपालिकेकडून त्यांना दरमहा १२० रुपयांत जागा दिली जाते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र २०२५ मध्ये खासदार डॉ. बिमोल अकोइजाम यांच्या निधीतून करण्यात आली.
पण बाहेरील रस्त्यांवर बसणाऱ्या महिलांकडे यापैकी कोणतीही सुविधा नाही. त्या अजूनही प्रखर उन्हात, सावलीशिवाय आणि पाण्याविना काम करतात.
आरोग्य व्यवस्था ताणाखाली
राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमाच्या राज्य समन्वय अधिकारी डॉ. नेविदा येंगखोम यांच्या मते, मणिपूरचा समावेश अधिकृतपणे उष्णतेच्या लाटांसाठी धोकादायक मानल्या गेलेल्या २३ राज्यांत होत नाही. आतापर्यंत इथे उष्माघातामुळे मृत्यूची अधिकृत नोंद नाही.
तरीही, तापमान सातत्याने वाढत आहे आणि त्याचे आरोग्यावरचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत, असे त्या सांगतात. (Imphal’s women’s market struggling)
राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये ‘कूलिंग वॉर्ड’ उभारण्यात आले आहेत. थंडावा देणाऱ्या सुविधांनी सज्ज ३२ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
वाहतूक पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी उष्णतेपासून बचावाचे प्रशिक्षण दिले जात आहे. माध्यमांद्वारे जनजागृतीही केली जाते.
२०२४ मध्ये आरोग्य विभागाने विशेषतः रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी जनजागृती मोहीम सुरू केली होती. मात्र “कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि इतर अडचणींमुळे” ती पुढे सुरू ठेवता आली नाही, असे डॉ. नेविदा यांनी सांगितले.
(नगांगोम सूरज हे मुक्त पत्रकार असून 101 Reporters या नेटवर्कचे सदस्य आहेत.)
