मुंबई : विशेष प्रतिनिधी : एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात स्वमालकीच्या २५ हजार बसेस घेणार असून त्या कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे. चालक-वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदेही भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला संचालक मंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. (ST recruitment)
उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन २०२४ पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक-वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या बससंख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल. त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (ST recruitment)
सध्या महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले प्रशिक्षण अधिकारी आवश्यक आहेत. विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत.
एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री