Home » Blog » Raut critcizes Shah: मी शहांचा राजीनामा मागितला असता

Raut critcizes Shah: मी शहांचा राजीनामा मागितला असता

सर्वपक्षीय बैठकीवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

0 comments
Raut critcizes Shah

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मी मुद्दाम गेलो नाही. गेलो असतो तर पहिल्यांदा गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला असता. त्यामुळे आपल्या सर्वांची अडचण झाली असती असे आपण शरद पवार यांना सांगितले, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (५ मे) पत्रकारांशी बोलताना दिली. (Raut critcizes Shah)

राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी होणार आहे. त्याबाबतचे निमंत्रण देण्यासाठी रविवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, पहेलगाम हल्ल्याबाबत आमची चर्चा झाली. पवार यांचे मत संकटकाळात सरकारसोबत असावे, असे आहे. परंतु हे सरकार त्या योग्यतेचे नाही. आमचे २७ लोक मारले गेले. त्यानंतरही अमित शहा खुर्चीवर बसले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दु:ख दिसत नाही. सर्वपक्षीय बैठकीत का आला नाहीत?, असे  शरद पवार यांनी विचारल्यानंतर मी  त्यांना सांगितले की, ज्या सरकारच्या काळात अनेक नरसंहार झाले, त्या सरकारच्या बैठकीत मी गेलो नाही. मी गेलो असतो तर अमित शहा यांचा राजीनामा मागितला असता. मग आपल्या सर्वांची अडचण झाली असती, असे त्यांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Raut critcizes Shah)

पवार काका-पुतण्या यांच्या नात्यांसंदर्भात वक्तव्य करताना ते म्हणाले, ‘संस्थांच्या कामांसाठी तसेच कौटुंबिक कारणास्तव  त्यांच्या भेटी होत असतात. कुटुंबाची नाती वेगळी असतात, राजकीय संबंध वेगळे असतात. शहा यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याचा त्रास शरद पवार यांना झाला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या शरद पवार अजित पवार यांना कधीच माफ करणार नाही.’ (Raut critcizes Shah)

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत राऊत म्हणाले, ‘अजित पवार हे भाजपमध्ये सहभागी झाल्याशिवाय कधीही मुख्यमंत्री होणार नाही. त्यांना त्यासाठी आपला गट भाजपमध्ये विलीन करावा लागले. त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल.’

संजय राऊत यांनी रविवारी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांना त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण दिले. त्याबाबत ते म्हणाले, ‘शरद पवार यांना पुस्तकाची प्रत हवी होती. त्यामुळे ती देण्यासाठी गेलो होता. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.’

बावनकुळे यांना लाज वाटली पाहिजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत काँग्रेस पक्ष फोडा असे वक्तव्य केले होते. त्याबाबत राऊत यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. राऊत म्हणाले की, ‘यांचे राजकारण केवळ फोडाफोडीवरच चालणारे आहे. या पक्षात सगळे धमक्या, भीती दाखवूनच आणण्यात आले आहे. असले घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपाला लाज वाटली पाहिजे त्यांची ही मस्ती व सत्तेची सूज जनता लवकरच उतरवेल, असेही ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00