मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात तिहेरी तलाक प्रश्नांवर महायुती सरकारमधील भाजपच्या देवयानी फरांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी विरोधी बाकावरील आमदारांनी सना मलिक यांची बाजू घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.
पाकिस्तानात बहुविवाहावर बंधने
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख केला. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्वासारख्या प्रथेमुळे मुस्लीम महिलांवर मोठा अन्याय होत आहे. पाकिस्तानातही बहुविवाहावर बंधने आहेत. मग भारतात का नाही? असा सवाल केला. राज्य सरकार समान नागरी कायदा कधी लागू करणार असा सवाल केला. (Malik and Farande face off over the Triple Talaq issue)
समान नागरी कायद्याबाबत सरकार सकारात्मक
या प्रश्नावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याचा अहवाल प्राप्त होता समान नागरी कायदा लागू करण्याबाबत पावले उचलली जातील असे सांगितले.
केवळ मुस्लीम समाजाला लक्ष्य का?
समान नागरी कायदा लागू झाल्यावर तो देशातील प्रत्येक नागरिकाला समान लागू होईल. त्यामुळे बहुपत्नीवर देखील आपोआप बंधने येतील असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या चर्चेत सहभागी होताना महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ही या मुद्द्यावर हरकत घेतली. त्या म्हणाल्या की,’ सध्या केवळ मुस्लिम समाजालाच लक्ष्य का केले जात आहे? बहुपत्नीत्व इस्लाम धर्मात मान्य असले तरी इतर धर्मांतही अशा घटना घडतात, त्याबाबत कोणी काही चर्चा करत नाही. मात्र केवळ मुस्लिम समाजालाच लक्ष्य का केले जात आहे?, असा सवाल आमदार सना मलिक यांनी करीत सरकारला घरचा आहेर दिला. (Malik and Farande face off over the Triple Talaq issue)
बहु पत्नीवादाच्या घटना अन्य धर्मातही
बहु पत्नीवादाच्या घटना अन्य धर्मामध्ये नाही आहेत का ?, मात्र त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. केवळ एका धर्माला का टारगेट केले जात आहे. , असा आरोप त्यांनी करीत या मुद्द्यावर चर्चेला नाराजी दर्शवली. तलाक ए हसन, तलाक ए अहसन हे प्रकार आम्ही पाळतो. पण तलाक ए बिद्दत ही वेगळी सांस्कृतिक प्रथा होती. तिचा कुराणमध्ये कुठेही उल्लेख् नाही. त्यामुळे भारतात जे अस्तित्वात नव्हते ते सरकारने रद्द केले अशी माहिती सना मलिक विधानसभेत दिली.
नितेश राणेंची टीका
मंत्री नितेश राणे यांनी समान नागरी कायदा (यूसीसी) आणि तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. तिहेरी तलाकबाबत केंद्र सरकारने आधीच निर्णय घेतला असताना, विधानसभेत बसलेले काही लोक अजूनही कुराण आणि मुस्लिम धर्मग्रंथांचा आधार घेत यूसीसीला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सना मलिकांच्या मदतीला जयंत पाटील धावले
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हा देश केवळ संविधानाने चालतो. तो कुराणवर चालत नाही असे प्रत्युंत्तर दिले. सना मलिक यांच्या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. सना मलिक यांना बोलण्यापासून रोखले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील त्यांच्या मदतीला धावले. सभागृहाची ही परंपरा आहे की कुणीही आपले मत मांडले तर ते पूर्ण ऐकूण घेतले पाहिजे. सना मलिक यांचे मत कुणाला आवडो न आवडो, त्यांना बोलण्यापासून रोखणे चुकीचे आहे. मी सना मलिकांच्या भूमिकाला पूर्ण समाधान देतो. (Malik and Farande face off over the Triple Talaq issue)