जमीर काझी : मुंबई : बालभारतीच्या २०२६-२७ च्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग २’ या पाठात चुकीची माहिती देण्यात आली आहे. देशातील मुलींची पहिला शाळा महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाईंनी सुरु केली असताना बालभारतीच्या पुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा‘ असा करण्यात आला आहे. देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे ऐतिहासिक महत्त्व संकुचित करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा हा ‘मनुवादी’ प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. (Incorrect information about Mahatma Phule in the book)
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून भारतातील स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हे ऐतिहासिक सत्य ठोस पुराव्यांवर आधारित आहे. परंतु सातत्याने हे सत्य नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे आणि तेच बालभारतीच्या पुस्तकातून पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे. ऐतिहासिक सत्य नाकारून चुकीचा इतिहास मांडण्याची मनुवादी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चालली आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात घसरण होत असून, त्याकडे शिक्षणमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. बालभारतीच्या पुस्तकातील ही चूक राज्य सरकारने तातडीने दुरुस्त करून संबंधितांवर कारवाई करावी, असेही राजहंस यांनी म्हटले आहे. (Incorrect information about Mahatma Phule in the book)