मुंबई : विशेष प्रतिनिधी : महिलाचे प्रसृतीपूर्व आणि प्रसृतीपश्चात आरोग्य उत्तम राहावे, या हेतूने चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून ‘स्वस्थ जन्म अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली. प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान प्रथम या दोन जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. (Health Mission)
शारीरिक आणि पोषणात्मक तयारीशिवाय गर्भधारणा राहू नये यासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात स्त्रीयांनी याकडे लक्ष द्यावे. महिलांच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष राहावे. महिलांच्या गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन व्हावे, या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. (Health Mission)
‘माझे आरोग्य, माझ्या हाती’ या अभियानांतर्गत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. आ. सुधीर मुनगंटीवार, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मंगेश गुलवाडे, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनकॉलॉजिस्ट्स सोसायज ऑफ इंडियाच्या डॉ. सुनीता तांदुलवाडकर तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, गर्भधारणेवेळी प्रत्येक महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित झाली पाहिजे. गर्भवतीच्या सदृढ आरोग्यासाठी फॉग्सी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘आयव्हीएचएम’ यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापुरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी. या समितीत शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून फॉग्सी आणि आयव्हीएमएमचे सदस्य घेण्यात येईल. (Health Mission)
गर्भधारणेपूर्वीचा कालावधी हा मातेचे आरोग्य अनुकूल करण्यासाठी आणि गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम झालेल्या महिलांना निरोगी गर्भधारणा होऊन सुरक्षित प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन नसेल तर रक्तक्षय, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, अकाली प्रसूती, जन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन आणि गर्भधारणेशी संबंधित इतर गंभीर समस्यांसह गुंतागुंत होण्याचा धोका संभवतो. यासाठी हे ‘स्वस्थ जन्म अभियान’ चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल. या अभियानाच्या यशस्वीतेनंतर ते सर्व राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
काँग्रेसला धोपटून संग्राम थोपटे भाजपमध्ये