Home » Blog » अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

by प्रतिनिधी
0 comments
Possibility of stormy rainfall in the state for four days

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत वातावरणात अचानक बदल झाला असून उत्तर भारतासह अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (IMD Weather Predictions)

भारतीय हवामान विभागाने ११ मे २०२६ रोजी सकाळी जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम, पूर्वोत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामान अस्थिर राहू शकते.

पश्चिमी वा-याचा प्रभाव

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमी वा-यांचा परिणाम पर्वतीय भागांसह मैदानी प्रदेशांवरही होत आहे. याशिवाय देशातील अनेक भागांत वातावरणीय चक्राकार हालचालीही सुरू आहेत. त्यामुळे अनेक राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

दिल्ली, पंजाबमध्ये पावसाचा अंदाज (IMD Weather Predictions)

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये ११ ते १४ मेदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या काळात ताशी ३० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

दिल्लीमध्ये अचानक धुळीचे वादळ आणि जोरदार वाऱ्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे काही काळ उष्णतेपासून दिलासा मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (IMD Weather Predictions)

राजस्थानमध्ये उष्णतेची लाट

राजस्थानमध्ये ११ आणि १२ मे रोजी काही भागांत पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह धुळीची वादळे येण्याची शक्यता आहे.

पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज असून रात्रीचे वातावरणही उष्ण राहू शकते. पूर्व राजस्थानमध्ये ११ ते १३ मेदरम्यान गरम वाऱ्यांचा प्रभाव वाढू शकतो. (IMD Weather Predictions)

लोकांना दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हिमालयीन राज्यांत गारपीट

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि उंच भागांत हलकी हिमवृष्टी होऊ शकते. मैदानी भागांत पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा अंदाज आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ११ आणि १२ मे रोजी गारपीटीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ आणि १३ मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेग ४० ते ६० किलोमीटर प्रतितास राहू शकतो.

ईशान्य भारतात मुसळधार (IMD Weather Predictions)

मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ११ ते १४ मेदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मेघालयातील काही भागांत ११ मे रोजी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बिहार, झारखंडमध्ये वादळी पाऊस (IMD Weather Predictions)

बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ११ ते १४ मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यासोबतच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे.

मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमधील अनेक भागांत पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेग ३० ते ५० किलोमीटर प्रतितास राहू शकतो. (IMD Weather Predictions)

तथापि, पुढील काही दिवसांत मध्य भारतातील तापमानात दोन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दक्षिण भारतात पावसाची शक्यता

तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरण राहू शकते.

केरळ आणि तामिळनाडूमधील काही भागांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाचा अंदाज आहे.

गुजरातमध्ये उष्णतेची लाट

गुजरातमध्ये ११ ते १४ मेदरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.

तर कोकण आणि गोवा परिसरात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (IMD Weather Predictions)

तापमानातील चढ-उतार कायम

१० मे रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे देशातील सर्वाधिक ४६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर झारखंडमधील रांची येथे किमान तापमान १६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

वादळी पाऊस, गारपीट, विजांचा कडकडाट आणि उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (IMD Weather Predictions)

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

हवामान विभागाने शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याचा सल्ला दिला आहे. जोरदार पावसाच्या भागांत शेतात पाणी न साचण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था करावी. केळी, नारळ आणि भाजीपाला पिकांना आधार द्यावा. सतत पावसात खत आणि कीटकनाशकांची फवारणी टाळावी

हवामानानुसार शेतीविषयक निर्णय घेण्यासाठी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00