जमीर काझी : मुंबई : महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना करून देश तोडण्याचे आखलेला कुटील डाव इंडिया आघाडीने हाणून पाडला आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केली. (INDIA alliance thwarted the plot to divide the country)
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, १६ एप्रिलच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नाही तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा पराभव झाला आहे. कारण महिला आरक्षण विधेयक तर २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले आहे. त्याचा कायदाही बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी भाजपा सरकार करत नाही. ‘नारी वंदना’च्या मुखवट्याआड संसदेची रचनाच नव्याने घडवण्याचे एक छुपे कारस्थान दडलेले आहे. हा केवळ महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबतचा प्रस्ताव नसून, लोकशाही आणि राज्यांच्या विधानमंडळांची पुनर्रचना करण्याचा एक प्रयत्न आहे आणि यातून आपल्याला राजकीयदृष्या फायद्याचे ठरेल, अशा पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा घाट घातलेला आहे. (INDIA alliance thwarted the plot to divide the country)
उत्तर भारतातील मतदारसंघ वाढणार?
.या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर भारतातील मतदारसंघ वाढतील व दक्षिणेकडील मतदारसंघांची मात्र तुलनेने कमी वाढ होईल आणि अर्थातच याचा सर्वात मोठा राजकीय लाभ भाजपालाच होणार आहे.असा दावा करून खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या,’ मतदारसंघ पुनर्रचना झाल्यास दक्षिण भारताचा वाटा २४% वरून २१% पर्यंत कमी होतो. गोव्याची एक जागा कमी होते. ईशान्य भारताचा वाटा ४.७% वरून ४.०% पर्यंत कमी होतो. ‘हिंदी पट्ट्या’चा वाटा ३३% वरून ३८% पर्यंत वाढतो. ‘हिंदी पट्ट्या’ला एकूण १३३ अतिरिक्त जागा मिळतात, तर संपूर्ण दक्षिण भारताचा एकत्रित विचार करता जागांमध्ये केवळ ४४ ची वाढ दिसून येते. एकट्या उत्तर प्रदेशलाच ५८ नवीन जागा मिळतात, जी संख्या पाचही दक्षिण भारतीय राज्यांच्या एकत्रित वाढीपेक्षाही अधिक आहे. (INDIA alliance thwarted the plot to divide the country)
तर महिलांसाठी १८१ जागा राखीव राहतील
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हा कायदा म्हणून यापूर्वीच संमत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत—५४३ जागांच्या लोकसभेत—जर या कायद्याची अंमलबजावणी केली गेली, तर महिलांसाठी अंदाजे १८१ जागा राखीव राहतील. महिला आरक्षणाचा संबंध ‘मतदारसंघ पुनर्रचनेशी’ जोडण्यामागे हेच खरे कारण आहे. ओबीसींसाठी उप-आरक्षणाशिवाय दिलेले महिला आरक्षण हे केवळ एक पोकळ आश्वासन आहे, असेही त्या म्हणाल्या. (INDIA alliance thwarted the plot to divide the country)
काँग्रेसने स्थानिक स्वराज्यसंस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की “महिला आरक्षणाच्या नावाखाली देशात ‘चोरवाटेने’ मतदारसंघ पुनर्रचना लागू करण्याचा भाजपा सरकारचा डाव इंडिया आघाडीने हाणून पाडला आहे. आता ते काँग्रेस व इंडिया आघाडीला महिला विरोधी ठरवत आहेत पण काँग्रेस पक्षानेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले आहे, यावेळी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, नगरसेवक राजा रहेबर खान, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर आदी उपस्थित होते