कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. मंडळाच्या दहा विभागामध्ये कोकण विभागाने अव्वल नंबर पटकावला आहे. त्याला ९८.६२ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी ९६.१४ तर मुलांची टक्केवारी ९२.२१ टक्के इतकी आहे. (Kokan Number one)
निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येईल, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे. (Kokan Number one)
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९८.८२ टक्के
निकाल कुठे पाहाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २८ हजार ५१२ खाजगी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.३६आहे. (Kokan Number one)
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या फेऱ्या माराव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.