मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांची कोणतीच सोय न केल्याने आंदोलन आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी आक्रमक न होता शांततेत आंदोलन करावे, सयंम राखावा असे आवाहन मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य अस्थिर झाले तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. (Jarange’s criticism)
पोलिसांनी पार्किंगसाठी मैदाने खुली करुन द्यावीत अशी मागणी जरांगेंनी केली आहे. रस्त्यावरील गाड्या मैदानात लावा, मुंबईत फिरा पण रस्ते अडवू नका अशा सूचना जरांगे यांनी दिल्या. आंदोलकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध न झाल्याने महानगरपालिकेसमोरील कांरज्यात आंघोळ करुन आंदोलकांनी निषेध केला. मुंबई महानगरपालिकेकडून सहकार्य होत नसल्याने ‘तुम्ही मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केले आहे. आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही’ असा इशारा दिला आहे. (Jarange’s criticism)
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे आझाद मैदानावर संपूर्ण चिखल आणि पाणी साचले आहे. परिसरातील सर्व खाद्य पदार्थ विक्री करणारी दुकाने आणि हॉटेल बंद असल्याने आंदोलकांनी वाहनातच जेवण बनवले आहे. आज शनिवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर रस्त्यांवर आंदोलकांनी गॅस शेगडीवर पोहे बनवले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून देता येणार नाही असे म्हणत अप्रत्यक्षपणे ओबीसीतून मराठा आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितल्याने आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आला नसतानाही आंदोलकांनी आझाद मैदान आणि परिसरात ठिय्या मारण्याचा निर्धार केला आहे. गणेशोत्सव आणि आंदोलन यामुळे निर्माण झाली कोंडी राज्य सरकार कसे फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jarange’s criticism)
आझाद मैदान, सीएसएमटी, महानगरपालिका परिसरात आंदोलकांनी ठिय्या मारल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. वाशी टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या लागल्या आहेत.
दरम्यान आज राज्यसरकारने मराठा समाजासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुक्यास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस सरकारने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण उप् समितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सुरू आहे. मंत्री मकरंद पाटील आणि दादा भुसे बैठकीला उपस्थित आहेत.