मुंबई : विलेपार्लेतील जैन मंदिर पाडणं पूर्वनियोजित कट आहे. याला राज्यातील ‘बुलडोझर सरकार’ जबाबदार आहे. भाजपच्या बुलडोझर राजवटीत मंदिरंसुद्धा सुरक्षित नाहीत. विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू रोडवरील तीस वर्ष जुने असलेले पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तोडणे हा एक पूर्वनियोजित कट होता, असा हल्लाबोल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.(Jain Mandir Demolition)
यासंबंधी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ही केवळ एक इमारत नव्हती. तर जैन समाजाच्या आस्था, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक होती. या अमानवी कारवाईत जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी, पूजनीय ग्रंथ व शास्त्रांचा अपमान करण्यात आला. काही मूर्ती खंडित झाल्या. ही घटना गंभीर आणि संतापजनक आहे. हा केवळ जैन समाजावरच नव्हे, तर आपल्या संविधानाच्या धर्मनिरपेक्ष आत्म्यावर थेट आघात आहे. ही कारवाई नेमकी कुणाच्या आदेशावरून झाली, याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे. (Jain Mandir Demolition)
जैन समाज शांतताप्रिय आहे, पण आज या अन्यायकारक कारवाईविरोधात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसने या आक्रोश मोर्च्यात भाग घेऊन समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या संदर्भात मी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जैन समाजाचा विलेपार्ल्यात विराट मोर्चा
दरम्यान, जैन मंदिराच्या पाडकामाविरुद्ध संपूर्ण जैन समुदायाने शनिवारी (१९ एप्रिल) मोठा निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी होऊन खा. गायकवाड यांनी जैन समुदायाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला. याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की, जैन मंदिर पाडल्याप्रकरणी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी त्याच जागी पुन्हा दिगंबर जैन मंदिर बांधून देण्याची ग्वाही दिली आहे. तत्पूर्वी सकाळी आम्ही या पवित्र स्थळाला भेट दिली आणि मंदिराच्या व्यवस्थापन समितीसह जैन समुदायाच्या पीडित सदस्यांना भेटलो. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, एका हॉटेल मालकाला या ठिकाणी बार उघडायचा आहे आणि त्यासाठी हा बुलडोझर चालवण्यात आला, असा दावा त्यांनी केला.