पुणे : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी आज सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सत्यशोधक विचारांचे निष्ठावंत अनुयायी, श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि श्रमिक चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. (Death of Baba Aadhav)
डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर पुणे हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांचे स्नेही राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. (Death of Baba Aadhav)
बाबासाहेब पांडुरंग आढाव असे त्यांचे नाव असले तरी बाबा आढाव अशी ओळख महाराष्ट्रासह देशाला होती. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे ते आधारस्तंभ होते. आपले संपूर्ण जीवन बाबांनी वंचित कष्टकरी समाजासाठी अर्पण केले होते. त्यांनी हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करुन त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्याचे काम केले होते. हमाल पंचायतीची स्थापना करुन पुण्यासह महाराष्ट्रातील हमालांचे संघटन केले होते. जातीभेदा विरोधात लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली होती. त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’, सत्यशोधनाची वाटचाल, सुंबरान ही पुस्तके लिहीली होती. सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल त्यांना कोल्हापूरात शाहू स्मारकच्यावतीने राजषी शाहू पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.