जमीर काझी : पनवेल : मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्यावेळी भारतीय सैन्यदल पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र तत्कालिन काँग्रेस सरकारने विदेशी शक्तीच्या दबावामुळे हल्ला करण्यास घाबरले होते, तो कोणता देश होता? हे काँग्रेसने जाहीर करावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले. (Congress scared to attack Pakistan)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे तसेच अंडरग्राउंड मेट्रो -३ च्या पहिल्या टप्याचे आणि मुंबई-१ अपचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल आचार्य देवत्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहळ,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.
मात्र राज्यातील अतिवृष्टी व शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत ही त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि स्थानिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Congress scared to attack Pakistan)
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘२००८ मध्ये लष्कराने पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी दाखवली होती. पण तत्कालीन काँग्रेस सरकारने विदेशी शक्तीचा दबाव असल्याने तसे करू दिले नाही. त्यांच्या एका ज्येष्ठ नेत्याने जो देशाचा केंद्रीय गृहमंत्रीही होता. त्यांनीच हा दावा केला आहे. कोणत्या विदेशी ताकदीच्या दबावामुळे काँग्रेस सरकार पाकिस्तानवर हल्ला करण्यास कचरले? याचे उत्तर काँग्रेसने दिले पाहिजे. देशाला हे जाणून घ्यायचं आहे.’असे आव्हान त्यांनी काँग्रेसला केले. पंतप्रधान मोदी म्हणाले,’ ‘काँग्रेसच्या या कमजोरीने दहशतवाद्यांना बळ दिले. देशाच्या सुरक्षेला कमकुवत केलं. त्यामुळे देशाला वारंवार जीव गमवावे लागले. आमच्यासाठी देश आणि देशवासियांपेक्षा महत्त्वाचं कुणीही नाही. आजचा भारत दमदार उत्तर देत आहे. आजचा भारत घरात घुसून मारतो. ऑपरेशन सिंदूरवेळी जगाने पाहिले आणि अभिमानाचा क्षणही अनुभवला आहे.’ (Congress scared to attack Pakistan)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ गेल्या ३० वर्षांपासून या विमानतळाची केवळ चर्चा होती. मात्र ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत यावे लागले. वर्षानुवर्षे रखडलेल्या परवानग्या त्यांनी अवघ्या एका बैठकीत मार्गी लावल्या. आठ वर्षांत विमानतळ पूर्ण झाला. केवळ हा एक विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री नायडू यांची भाषणे झाली.