महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातू बाहेर फेकले गेले. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक. अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीशी निष्ठा बाळगलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या पुढच्या पिढीने भाजपचा रस्ता धरला. श्रीपतरावांच्या कन्या स्वाती कोरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाजवादाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला.
विजय चोरमारे
स्वाती कोरी यांची दखल घ्यावी, अशी परिस्थिती नाही. आणि त्यांचे राजकारणही तेवढे प्रगल्भ नाही. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीची कास न सोडणा-या श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या म्हणून त्यांची दखल घेणे भाग पडते. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारसरणीला श्रद्धांजली वाहिली म्हणून त्यांची दखल घेणे भाग पडते. परवा गडहिंग्लजमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
मुश्रीफांच्या राजकारणाला कंटाळून भाजपात प्रवेश
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात गडहिंग्लज शहर येते. विधानसभेला मुश्रीफ यांचे वर्चस्व आहेच. परंतु आता नगरपरिषदही त्यांनी ताब्यात घेतली आहे. मुश्रीफ यांचा मुकाबला करण्यासाठी स्वाती कोरी यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ति या पक्षांसोबत आघाडी केली होती. परंतु त्या आघाडीचा निभाव लागला नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपशी आघाडी करून एक पाऊल पुढे टाकलेल्या स्वाती कोरी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून पुढचे पाऊल टाकले आहे. सत्तेशिवाय राजकारण करण्याची कुणाचीच तयारी नसल्याचे त्यांच्या भाजप प्रवेशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुश्रीफ यांच्या दबावाच्या राजकारणाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात समाजवादीचा झेंडा
.गडहिंग्लज हा खरेतर मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. साठ वर्षांपूर्वी तिथे जनार्दन पेडणेकर, एस. एन. खन्ना आणि श्रीपतराव शिंदे यांनी समाजवादी विचारसरणीचे बीज रोवले. पेशाने वकिल असलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात १९५६ साली समाजवादी पक्षातून झाली. १९७४ मध्ये त्यांनी गडहिंग्लज नगरपरिषदेची निवडणूक लढविली. नगरपालिका शिक्षण मंडळाचे ते पहिले सभापती बनले. नगरपालिकेनंतचा पुढचा टप्पा स्वाभाविकपणे विधानसभेचा होता. गडहिंग्लज हा काँग्रेसचा बालेकिल्ला. डॉ. एस. एस. घाळी हे स्थानिक पातळीवरील मोठे प्रस्थ होते. १९८५ साली डॉ. घाळी यांचा पराभव करून श्रीपतराव शिंदे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत बाबा कुपेकर यांना पराभूत केले. काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेत त्यांनी दोन वेळा आमदारकी मिळवली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. निव्वळ सत्तेचे राजकारण न करता कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण करण्याचा प्रयत्न ते करीत होते, त्याचेच फळ त्यांना विधानसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांमधील विजयाच्या रुपाने मिळाले.
गडहिंग्लज नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अप्पासाहेब नलवडे यांनी स्थापन केलेला. स्वतः नलवडे त्यांना बारा-तेरा वर्षेच सत्ता मिळाली. उलट श्रीपतराव शिंदे यांनी तेवीस वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले.
आणीबाणीच्या काळात श्रीपतरावांनी दीड वर्षे तुरुंगवास भोगला. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, मधु दंडवते यांच्यासारख्या नेत्यांचे प्रेम आणि सहवास त्यांना लाभला. मूळचे आक्रमक स्वभावाचे श्रीपतराव शिंदे या थोर नेत्यांच्या सहवासात प्रगल्भ बनले. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)
श्रीपतराव शिंदेंनी चळवळींना बळ दिले
राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून श्रीपतरावांच्या नेतृत्वाची घडण झाली होती. श्रोत्यांना आपले मुद्दे पटवून देण्यात माहीर होते. साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवतानाही त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून विविध चळवळींना बळ देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सहकारमहर्षी आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त साखर कारखाना होता. त्या माध्यमातून अप्पासाहेब समाजवादी परिवारातील संस्थांना, विविध चळवळींना मदत करीत होते. तोच वसा त्यांचे पुत्र गणपतरावदादा पाटील चालवत आहेत. श्रीपतराव शिंदे यांनीही तोच कित्ता गिरवला. साखर कारखान्याच्या सत्तेचा विधायक वापर केला. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा किसन अहिर शेतकरी सहकारी साखर कारखाना चळवळींचा ऊर्जास्त्रोत म्हणून काम करीत होता. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ताही अनेक वर्षे होती. नगरपालिकेमार्फत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले.
एकूण राजकीय कारकिर्दीत श्रीपतरावांनी आठवेळा विधानसभा, एकदा लोकसभा, दोन वेळा जिल्हा परिषद, एकदा विधानपरिषद निवडणूक लढवली. दोनवेळा ते आमदार झाले. राजकारणात वाटचाल करतानाच गडहिंग्लज उपविभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालय सुरू केले. राधाबाई शिंदे फार्मसी महाविद्यालय, रचना पब्लिक स्कूलची स्थापना केली. संस्थात्मक काम म्हणावे तर एवढेच.
एक प्रसंग मुद्दाम सांगण्याजोगा आहे
१९९९च्या विधानसभा निवडणूकीत जनता दलाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती. आघाडीच्या धोरणानुसार विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात येणार होती. गडहिंग्लजमधून १९९५ साली बाबा कुपेकर निवडून आले होते. कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि त्यातही शरद पवार यांचे अत्यंत जवळचे. स्वाभाविकपणे ती जागा त्यांच्याकडे जाणार होती. श्रीपतराव शिंदे यांचीही मतदारसंघात मजबूत व्होटबँक. १९८५ आणि १९९० अशा दोनवेळा ते निवडून आले होते. यावेळी श्रीपतरावांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर मोठी मिरवणूक काढली. शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या प्रचंड सभेत त्यांनी अचानक जाहीर केले की, आघाडीचा धर्म म्हणून मी अर्ज भरणार नाही, आपण बाबा कुपेकर यांचे काम करावयाचे आहे. उभी हयात कुपेकर यांच्याविरोधात लढण्यासाठी घालवलेल्या कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया झाली असेल कल्पना केलेली बरी. कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. आक्रोश केला. परंतु श्रीपतराव बधले नाहीत. आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्या निवडणुकीत त्यांनी कुपेकर यांना पाठिंबा दिला आणि कुपेकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.
श्रीपतराव शिंदे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गडहिंग्लज, चंदगड, आजरा, निपाणी, संकेश्वर या परिसरातील विविध परिवर्तनवादी चळवळींचे पाठिराखे होते. व्यक्तिगत राजकारणासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. चळवळ आणि राजकारण याची कधी गल्लत केली नाही, की आपल्या राजकारणासाठी कुठल्या चळवळीचा कधी बळी घेतला नाही.
अखरेपर्यंत धर्मनिरपेक्ष विचारांची कास धरली
धर्मांध शक्तिंच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसून त्यांनी शक्य त्या सर्व तडजोडी केल्या. अखेरपर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारेची कास सोडली नाही. कम्युनिस्ट पक्षाचे गोविंदराव पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. एन. डी. पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राला ज्ञात असलेले मोठे नेते. सत्तेच्या माध्यमातून रचनात्मक काम उभे करणारे श्रीपतराव शिंदे त्याच पंगतीतले तेवढ्याच तोलामोलाचे नेते होते. श्रीपतरावांनी आयुष्यभर ज्या शक्तिंविरोधात संघर्ष केला त्याच शक्तिंच्या कळपात त्यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी प्रवेश केला आहे.
श्रीपतराव शिंदे यांचा गडहिंग्लजमध्ये दखलपात्र गट होता. त्याचे नेतृत्व स्वाती कोरी यांच्याकडे होते. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत. श्रीपतरावांचे कार्यकर्ते हे विचारांशी बांधिलकी असणारे होते. त्यामुळे ते त्यांच्यासोबत किती प्रमाणात जातात, हे पाहावे लागेल. (Final nail in the coffin of socialism was hammered in at Gadhinglaj)