नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. इम्फाळमधील राजभवन येथे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामापत्र सुपूर्द केले. मणिपूरमध्ये मागील दोन वर्षांहून अधिक काळ अशांतता असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी हा राजीनामा दिला आहे. (Biren Singh)
सिंह यांनी रविवारी सकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर, राज्यामध्ये परतून सिंह भाजपचे खासदार संबित पात्रा, राज्याचे मंत्री आणि आमदारांसह राज्यपालांच्या भेटीस गेले. राज्यपालांना सादर केलेल्या पत्रामध्ये सिंह यांनी केंद्र सरकारचे ‘तत्पर कार्यवाही, हस्तक्षेप, विकासकामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीबद्दल’ आभार मानले आहेत. मणिपुरी जनतेच्या हितांचे रक्षण केल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळावा, असे काही प्राधान्याचे विषयही त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहेत. त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. (Biren Singh)
- हजार वर्षांचा इतिहास असणारे मणिपूरचे प्रादेशिक ऐक्य कायम राखावे.
- सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवावी आणि अनधिकृत स्थलांतरितांना हुसकावून लावावे.
- अंमली पदार्थांची तस्करी व त्याच्याशी संबंधित दहशवादाविरुद्धची लढाई सुरू ठेवावी.
- सीमाप्रदेशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
त्यांच्या राजीनाम्यानंतर, राज्यपाल पुढील पावले उचलतील. दरम्यान, आगामी अधिवेशनामध्ये सिंह यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात येण्याची शक्यता असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मागील अडीच वर्षे मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या वंशाच्या नागरिकांमध्ये हिंसाचार सुरू असून आतापर्यंत अडीचशेहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. ६० सदस्यांच्या मणिपूर विधानसभेमध्ये भाजपचे ३७ आमदार असून नागा पीपल्स फ्रंटच्या पाच आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. मागील महिन्यात संयुक्त जनता दलाच्या एकमेव आमदाराने सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. (Biren Singh)
Manipur CM N Biren Singh hands over the letter of resignation from the post of Chief Minister to Governor Ajay Kumar Bhalla at the Raj Bhavan in Imphal. pic.twitter.com/zcfGNVdPPo
— ANI (@ANI) February 9, 2025
हेही वाचा :