बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री ही भारतीय सैन्यातील जुनी रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला शौर्याची परंपरा आहे. या शौर्याच्या परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्त यांचे सैनिकांच्या जीवनात महत्व आहे. प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा सेवा बजावताना उपयोग होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत राहणे आवश्यक आहे, असे उद्गार मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी काढले. अग्निविरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.(Belgaum Agniveer)
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५९ अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. तिरंगा ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र धर्माग्रंथाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी देशसेवेची आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली.
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी प्रशिक्षणार्थी जवानांकडून मानवंदना स्वीकारली. परेडचे नेतृत्व अग्निवीर गजानन राठोड याने केले तर लेफ्टनंट कर्नल दिग्विजय सिंग यांनी परेड अड्जयूटंटची जबाबदारी पार पाडली. (Belgaum Agniveer)
दीक्षांत समारंभाला अग्निविरांचे कुटुंबीय, लष्करी अधिकारी, एनसीसी छात्र आणि निमंत्रित उपस्थित होते. युद्ध स्मारक येथे अभिवादन झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा :
जगातील सर्वांत उंच पुलाचे उद्घाटन
रेपो दरात ५० पॉईंटची घसघशीत कपात