नवी दिल्ली : महायुती सरकारने अजुनही केंद्र सरकारला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. मात्र आज बुधवार खासदार सुप्रिया सुळे यांनी हाच मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राकडून अतिवृष्टीचा प्रस्ताव आल्याची माहिती दिली. शिवराजसिंह चौहान यांनी २४ तासात घुमजाव केल्याचे चित्र पहायला मिळाले. मंत्री चौहान यांनी आपली काल चूक झाली अशी कबुलीही दिली. (Shivraj Singh Chouhan’s U-turn)
लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कालच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे सरकार सत्तेमध्ये येताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने बोलत होते की, आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये मदत करू. पण या गोष्टी होताना दिसत नाही, असा आरोप सुळे यांनी केला. (Shivraj Singh Chouhan’s U-turn)
सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अतिवृष्टीचा प्रस्तावासंबधी २७ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरला अहवाल पाठवल्याची माहिती दिली. ते म्हणाले, काल माझ्याकडून माहिती देण्यात चूक झाली होती, पण आज मी माझी चूक सुधारत आहे. यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवराजसिंह चौहान यांचा मोठेपणा आहे की, ते महाराष्ट्र सरकारला वाचवत आहेत. कारण मी आजच महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, आम्ही अजूनपर्यंत पूर्ण अहवाल पाठवलेला नाही. आमचा एक सर्व्हे झाल्यावर एक कमिटी स्थापन करण्यात येईल, त्यानंतर केंद्राला अहवाल पाठवण्यात येईल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, मी प्रत्येक राज्याच्या संपर्कात असतो. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला आहे. यानंतर सुप्रिया सुळे पुन्हा म्हणाल्या की, मी महाराष्ट्र सरकारच्या विधानाने समाधानी नाही, पण शिवराज सिंह यांच्या वक्तव्याने समाधानी झाली आहे. (Shivraj Singh Chouhan’s U-turn)