पंढरपूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लागले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र येणार होते. त्यामुळे मेळाव्याबाबत उत्सुकता होती. मेळाव्यात बोलताना राज आणि उद्धव यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. (Fadanvis criticizes Uddhav)
या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यावर प्रतिक्रीया देताना राज ठाकरे यांचे आभार मानले, मात्र दुसरीकडे उद्धव यांना रूदालीची उपमा देत त्यांच्यावर टीका केली. (Fadanvis criticizes Uddhav)
विजयी मेळाव्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘‘मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन भावांना एकत्र येण्याचे श्रेय मला दिले. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.
‘‘मला असं सांगण्यात आलं होतं, की आज मराठीचा विजयी मेळावा आहे. पण त्याठिकाणी रुदालींचं भाषणही झालं. त्यांनी मराठीबाबत एक शब्द न बोलताना आमचं सरकार पाडलं, आमचा पक्ष फोडला, हे रडगाणं सुरू होतं. हा मराठीचा विजय नव्हता, तर रुदाली होती. या रुदालीचं दर्शन या ठिकाणी झालं,’’, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
उद्योजक केडियांनी मागितली माफी