मुंबई : “विधानसभा निवडणुकीवेळी जे घडले तीच चूक परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला अर्थ नाही. या सगळ्याला समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेले होते हे मान्य करावे लागेल. मविआत लोकसभा निवडणुकीवेळी आपलेपणा होता, विधानसभेला मात्र मीपणा समोर आला आणि आपला पराभव झाला,” असे स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. (Uddhav Thackray Interview)
‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आणि विद्यमान महायुती सरकारच्या कारभाराबाबतची मते स्पष्टपणे मांडली. (Uddhav Thackray Interview)
प्रत्येक बाबतीत हात वर करून चालणार नाही. आपण जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत, असे सांगून ते म्हणाले, विधानसभेवेळी ईव्हीएम आणि मतदार याद्यांचा घोटाळा झाला, बोगस मतदार आले, काही मतदारसंघात अखेरच्या क्षणी मतदार वाढले, यावर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर सरकारने काही योजना जाहीर केल्या. त्यात ‘लाडकी बहीण’सारखी योजना होती. या सगळ्यामुळे त्यांना निवडणुकीत यश मिळाले. यामध्ये पुढे सरकारची फसगत झाली ती गोष्ट वेगळी.” (Uddhav Thackray Interview)
जागावाटपाचा घोळ नडला
“अपयशाचे दुसरे कारण म्हणजे लोकसभेवेळी मी फेब्रुवारीत प्रचाराला सुरुवात केली होती. त्यावेळी माझ्यासमोर माझे उमेदवार होते. परंतु, माझ्याकडे निवडणूक चिन्ह नव्हते. विधानसभेला चिन्ह होते, परंतु जागा कुठल्या असणार, कुठल्या जागेवर मी कोणता उमेदवार देणार हे ठरले नव्हते. ही आपल्याकडून झालेली मोठी चूक होती. जागावाटपाचा घोळ नडला. बराच वेळ तू तू – मैं मैं सुरू होते. हा घोळही नडला,” अशा शब्दांत अपयशामागचे विश्लेषण त्यांनी केले.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आपण तीन प्रमुख पक्ष एकत्र आलो होतो. जागावाटपावरून आपल्यात खेचाखेच झाली, तशीच खेचाखेच महायुतीतही झाली. महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदार संघ आपण आपल्या मित्रपक्षांसाठी सोडले. तसेच आपल्या मित्रपक्षांनी देखील सोडले. परंतु विधानसभेला सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडले नाही. शेवटच्या दिवसापर्यंत जागांवरून खेचाखेच सुरू राहिली. त्याचा परिणाम असा झाला की, मविआत आत्ताच इतकी खेचाखेच सुरू असेल तर नंतर काय होईल असा प्रश्न लोकांना पडला. त्याचा परिणामही जागा जिंकण्यावर झाला.’’