जमीर काझी : मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार असलेतरी मी त्यात समाधानी नाही. मला ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे. यासाठी आगामी काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अशी मेहनत करा की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी केले.
चर्चगेट जवळ बांधण्यात येणाऱ्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाह यांनी राजकारणातील घराणेशाहीवरुन पुन्हा एकदा विरोधकांवर प्रहार करून ते म्हणाले,’ या देशात केवळ घराणेशाहीमध्येच पॉलिटीकल पॉर्टी चालणार नाही तर क्वॉलिटी आणि परफॉर्मन्स असणारा टिकेल आणि तेच राजकारणात असतील, राजकीय पाश्वभूमी नसलेले अनेकजण आहेत. याचं उत्तम आणि मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. एका साधारण घरात जन्मल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम घेतले, त्यामुळं मोदी हे तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले. देशात भाजपा सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. अयोध्यात राम मंदिराचे स्वप्न सुद्धा पूर्ण झालं आहे. देशावर ज्यांनी हल्ला केला, त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम सरकारनं केले आहे. (Triple Engine Government)
अमित शाह म्हणाले, आज महाराष्ट्र भाजपासाठी शुभ दिवस आहे.कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे एक मंदिर आहे. कार्यालयामध्येच कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. कार्यालयमध्ये कार्यकर्ता घडत असतो. जनसंघाच्या स्थापनेपासून आम्ही सिद्धांत, विचार आणि तत्व या मूल्याचा अवलंब लोकासाठी करत आलोय. ५५ हजार स्कवेअर फूटमध्ये अतिशय भव्य-दिव्य ही कार्यालयाची प्रस्तावित इमारत पाहून मी प्रदेशाध्यक्षांना धन्यवाद देतो. या कार्यालयमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय देखील असणार आहे. ‘अंधेरा हटेगा, कमल खिलेगा’ असं दिवंगत अटलबिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं, ते आज खरं ठरतंय. पक्षानं सुरुवातीला एक बीज रोवलं होतं. त्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालंय, हे पाहून आनंद होतोय. हे कार्यालय लाखो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा ठरेल, असा विश्वास शाहांनी व्यक्त केला. (Triple Engine Government)
… आम्ही काचेच्या घरात राहत नाही : मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ २०१४ च्या निवडणुकीवेळी आपले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई पंधरा दिवस त्या कार्यालयातच होते. पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यालयात राहिले. पूर्ण निवडणुकीचं संचालन करायचे आणि मुंबईचा आवडता वडापाव खायचे. प्रदेशाचे मोठे कार्यालय असावे यासाठी जागा सातत्याने आम्ही शोधत होतो. खूप ठिकाणी जागा बघत होतो. त्यामुळं ही जागा सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण करुनच घेतली आहे. सगळ्या प्रकारच्या नियमाचं पालन करुन ही जागा घेतली आहे आणि भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतली आहे. त्यामुळं ज्यांनी इतरांच्या जागा बळकावल्या त्यांनी आम्ही काचेच्या घरात राहत नाही, संजय राऊत यांचे नाव न घेता टोला मारला. (Triple Engine Government)