- डॉ. अमोल कोल्हे
अजितदादांची आणि माझी पहिली भेट अगदीच अनौपचारिक पद्धतीने साधारण २००३-०४ मध्ये झाली. त्यावेळी मी ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होतो. वडील कृष्णा खोरे महामंडळात नोकरीत होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने बदलीचा प्रश्न होता. त्यावेळी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनता दरबार आयोजित केला होता. माझी काहीच ओळख नव्हती. मी वडिलांचा अर्ज घेऊन जनता दरबारात अजित पवारांना भेटायला गेलो. दादांनी माझ्याकडून अर्ज घेतला. अर्ज पाहिला, ‘सगळी कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना, मागणी रास्त आहे ना?’ असे विचारले. मी होय सांगताच उद्या ऑर्डर निघेल असे सांगितले. खरंच दुसऱ्या दिवशी बदलीची ऑर्डर हातात होती. कामाच्या या झपाट्याचा प्रभाव आजही माझ्या मनावर तसाच आहे. माझी काहीही ओळख नाही, माझी कागदपत्रे योग्य, मागणी करतो ती न्याय आहे, तत्क्षणी निर्णय घेण्याची कार्यपद्धती भावली. दादांविषयी कोणीही काहीही आक्षेप घेतात त्यावेळी ती आठवण आजही मनात उफाळून येते. (Amol Kolhe on Ajitdada)
हक्काची जागा
दादांशी दुसरी भेट झाली ती २००९ मध्ये. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. माझी ‘राजा शिवछत्रपती’ मालिका सुरू होती. मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी अनेक पक्षांकडून इच्छा होती. काही कार्यकर्त्यांनी सांगितले, दादांना भेटायचे आहे. त्यावेळी मी सांगितले की, ‘राजकारणात मला अजिबात स्वारस्य नाही.’ मालिका अर्धवट असल्याने राजकारणात येणे शक्य नव्हते. त्यावेळी दादांबरोबर भेट झाली. स्वतः साहेब (शरद पवार), दादा, आर. आर. आबा, दिलीप वळसे-पाटील, विजयदादा, छगन भुजबळ असे सर्व असताना ती भेट झाली. तिथे नम्रपणे मला शक्य नाही, असे सांगून बाहेर पडलो होतो. त्यावेळी दादांचा आश्वासक हात, नव्याने राजकारणात येणाऱ्या माणसाला विश्वास देणे मला भावले. त्यानंतर २००९ ते २०१४ या काळात मंत्रालयात कोणत्याही कामासाठी जायचे असल्यास हक्काची जागा म्हणजे अजितदादा. आपुलकी किंवा स्नेह जपणे, मान देणे काय असते, ते दादांकडून मला कायम अनुभवायला मिळाले. (Amol Kolhe on Ajitdada)
२०१४ मध्ये राजकारणात येण्याविषयी मला पुन्हा विचारणा झाली. त्यावेळीही देवगिरी बंगल्यावर एक ते दीड तास चर्चा करताना दादांनी वडिलकीच्या नात्याने अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची गोष्ट दादांच्या कानावर आदल्या रात्री घातली, इतके ते आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते दादांनी तयार केले होते. माझे ऐकून घेतल्यावर दादांनी ‘गडबड करू नका, मी रात्री उशिरा मुंबईत येत आहे, भेटून बोलू’ असे सांगितले. ‘दादा आता निर्णय झालेला आहे. शब्द देऊन बसलो आहे, आणि मी प्रवेश करीत आहे, माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे की, तुम्हाला अंधारात ठेवून मी काही निर्णय घेणार नाही.’ असे सांगितले. (Amol Kolhe on Ajitdada)
समोरच्याच्या निर्णयाचा आदर
मी शिवसेनेत प्रवेश केल्यावर दोन दिवसांनी फोनवर शुभेच्छा देत ‘सांभाळून करा’ हे दादांचे वाक्य आपुलकी व्यक्त करणारे होते. माझ्या २०१९ च्या प्रवेशाचे पडद्यामागील खरे सूत्रधार दादाच आहेत. माझ्या मनाची तयारी झाल्याशिवाय मी त्यांच्यावर दबाव आणणार नाही, असे सांगून दादांनी वेळ दिला. सत्तेच्या पदावर असणाऱ्या तसेच प्रभावशाली व्यक्तिने समोरच्याच्या निर्णयाचा आदर करणे, याचे खरोखरच अप्रूप वाटते. निवडणुकीच्या काळात अनेक प्रश्न मनात होते. सर्व प्रश्नचिन्हांवर एकच उत्तर होते अजितदादा. दादांनी शब्द दिला की तो पाळला जातोच, हा त्यांच्याबद्दलचा कार्यकर्त्यांमध्ये अनुभव आहे आणि त्याचा अनुभव पहिल्या भेटीपासून घेत आहे. लोकसभा निवडणुकीत दादांनी खूप प्रयत्न केले. सर्वसामान्य कार्यकर्ता शब्दावर विश्वास ठेवून निवडणूक लढवत आहे. पक्ष, नेतृत्व हा भाग बाजूला ठेवू यात… कार्यकर्त्याचा विश्वास तुटू नये, यासाठी चाललेली दादांची धडपड मी त्या काळात पाहिली.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दादांना खूप जवळून अनुभवता आले. दादा म्हणजे सत्तेच्या धबडग्यात नसलेले दादा होते. महाराष्ट्राच्या राजकारणाकडे, समाजकारणाकडे, विकासकारणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अनुभवता आली. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रात्री अपरात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचो आणि सकाळी सात वाजता दादा सर्वांना ‘तयार झाले का बघा’ म्हणून विचारायचे. ‘हा मुलगा राजकारणात नवीन आहे, त्याला या लाइफस्टाइलची सवय व्हायला वेळ लागणार आहे,’ याचे भान त्यांना असायचे. रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्यानंतर ते हळूच मला सांगायचे, ‘तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला झोप जास्त लागते.’ इतक्या बारकाव्याने वडिलधारी व्यक्ती काळजी घेणारा असल्यास त्याबद्दल तुम्हाला आपुलकी का वाटणार नाही?
शिवस्वराज्य यात्रेच्या आठवणी
मनातील सर्व प्रश्न विचारण्याची हक्काची जागा म्हणजे दादांची गाडी. दादा प्रत्येक प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तर द्यायचे. दादांना कार्यकर्त्यांची नस किती चपखल माहीत आहे, याचा प्रत्यय शिवस्वराज्य यात्रेत आला. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या भागात केलेली कामे सांगितली. बंधारे व अन्य कामातून शेती कशी फुलली ते सांगितले. खरंतर ते मला सांगायचे काही कारण नव्हते. परंतु ते त्यांचे आत्मचिंतन होते. अनेकांना विश्वासही बसणार नाही. प्रशासनावर पकड असल्याचा अनुभव ठायीठायी येतो. (Amol Kolhe on Ajitdada)
शिवस्वराज्य यात्रेच्या काळातील अशीच एक आठवण आहे. एकदा आम्ही दोघेच गाडीतून निघालो होतो. शिवस्वराज्य यात्रेचा तो सुरुवातीचा काळ होता. राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर होते. बरेचसे नेते अद्याप शिवस्वराज्य यात्रेत सहभागीही झाले नव्हते. अशावेळी मी काळजीच्या स्वरात त्यांना विचारलं, `आपण निघालोय पण यात्रेचं पुढं कसं होणार?`त्यावर ते म्हणाले, `काहीही झालं तरी आता थांबायचं नाही. प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कुणी आलं नाही तरी आपण दोघं मिळून यात्रा पूर्ण करायची. मला खात्री आहे की, यात्रा पूर्ण होईल तेव्हा आपण सत्तेच्या जवळ पोहोचलेले असू.` पुढं अमोल मिटकरी आले. जयंत पाटील यांच्यासह बाकीचे नेतेही आले आणि शिवस्वराज्य यात्रेने इतिहास घडवला. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्रिपदावर असताना शिवस्वराज्य यात्रेसंदर्भातली कृतज्ञता म्हणू किंवा जाणीव त्यांच्या मनात कायम होती. अनेकदा सत्ता आल्यावर लोक अशा गोष्टी विसरतात. अजितदादांनी कधी बोलून दाखवले नसेल, परंतु सत्ता येण्यात शिवस्वराज्य यात्रेची भूमिका महत्त्वाची ठरली, याचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही.
महानाट्याचे पहिले निमंत्रण दादांना
पिंपरी-चिंचवडमध्ये `शिवपुत्र संभाजी` महानाट्याचे प्रयोग होत असताना त्याचे पहिले निमंत्रण मी अजितदादांना दिलं. याचं एक फार वेगळं कारण आहे. गेली कित्येक वर्षे, कित्येक शतके छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू-तुळापूर येथे होती. हे आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे की, अजितदादा हे पहिले राजकीय नेते आहेत, ज्यांनी या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले, ज्यांनी त्या समाधीसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी दिला. ही फक्त भावनिक गोष्ट नाही. त्यासाठी आपण म्हणतो ना, पाहिजे जातीचे. ती शिव-शंभू भक्ती आहे. मला आठवतं, शिवस्वराज्य यात्रा काढायची ठरवलं तेव्हा त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज असायला पाहिजे याचा पहिला पुरस्कार करणारे अजितदादा होते. दादांच्या मनात शिव-शंभू भक्ती असल्याचेच हे निदर्शक आहे. छत्रपती संभाजीराजे समाधीस्थळासाठी त्यांनी वित्त आणि नियोजन मंत्री असताना जे योगदान दिले आहे, ते एवढ्या वर्षात घडले नव्हते. प्रत्येक शिव-शंभूप्रेमीने त्यांचे हे योगदान लक्षात ठेवायला पाहिजे. (Amol Kolhe on Ajitdada)
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर पहिल्या अधिवेशनात एकहाती किल्ला लढविणे म्हणजे काय असते ते दादांनी दाखवून दिले. कोरोनाच्या लाटेमध्ये पुणे देशात हॉटस्पॉट होते. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, प्रशासनाला काय सूचना कराव्या लागतात, हे त्यांनी दाखवून दिले. पुणे जिल्ह्याने कोरोनावर मात केली. त्यामध्ये दादांचे नेतृत्व ही फार मोठी बाब आहे. तुटपुंज्या वैद्यकीय मनुष्यबळाच्या जोरावर कोरोनाचा मुकाबला त्यांनी केला.
कोविडच्या काळात आपल्या एकूण आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्या होत्या. त्यावेळी मी इंद्रायणी मेडिसिटीची संकल्पना अजितदादांच्यापुढे मांडली होती. २६ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स एकाच संकुलात उभारण्याची ही योजना होती. अजितदादांनी ती योजना समजून घेतली आणि त्यांना पटल्यावर ती साकारण्यासाठी झपाटून कामाला लागले. त्यासाठीची जागा निश्चित करणे किंवा अन्य बाबींसाठी पावले टाकायला सुरुवात केली. तीन बैठका झाल्या. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाल्यामुळे ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही. मात्र त्यादृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. संकल्पना मांडल्यानंतर अजितदादांनी ती पटकन समजून घेतली आणि कामाला लागले. राजकीय नेतृत्वाच्याठिकाणी एवढी तत्परता अपवादानेच आढळते.
दमदार अर्थमंत्री (Amol Kolhe on Ajitdada)
अर्थमंत्रिपदाची धुरा वाहत असताना आर्थिक अडचण दादांनी कोठेच जाणवू दिली नाही. कोविड काळात दोन वर्षांचा खासदार निधी गोठवला. खासदार म्हणून काम करताना दोन वर्षे खासदार निधी नाही. संसदेत आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांना सांगितले, निधी कशा पद्धतीने देता येतो हे तुम्ही आमच्या अजितदादांकडून काहीतरी शिका. दादांनी आमदार निधी थांबविला नाही. तीन कोटी आमदार निधी असतानाही कोरोनासाठी प्रत्येक आमदारांना दादांनी एक-एक कोटींची तरतूद करून दिली. ही सांगड घालत असतानाचा ताण त्यांच्या कामावर कधीच दिसला नाही..पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आणि चाकणच्या चौकातील उड्डाणपूल हे प्रश्न आपण मार्गी लावण्यात दादांचा पाठपुरावा कारणीभूत आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण पाहिल्याबरोबर ते म्हणाले, “या भागाचा चेहरामोहरा बदलणारा हा प्रकल्प आहे. यासाठी निधीची तरतूद करून तशी घोषणाही केली. चाकणच्या उड्डाणपुलाच्या प्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीत दादांनी पाठपुरावा केला. खासदार म्हणून प्रश्न मांडल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पाठबळ देणे व त्याबाबत आग्रही राहणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अप्रूप वाटते. हडपसर लोणी-काळभोरपर्यंत मेट्रोची आमची मागणी होती. दादांनी निर्णय घेऊन ती सासवडपर्यंत नेली आहे.
विकास प्रकल्पांमागे सौंदर्यदृष्टी
विकासाचे प्रकल्प मार्गी लावत असताना दादांची सौंदर्य दृष्टी कायम जागरूक असते. एका प्रकल्पाचे दादांसमोर सादरीकरण झाले. ते पाहिल्यावर त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प योग्य नाही. मी दादांकडे आश्चर्यकारकरित्या पाहिले. मी म्हणालो, ‘प्रकल्प चांगला आहे.’ त्यावर ते म्हणाले, ‘डॉक्टर’ याने शहराचे सौंदर्य कमी होऊन जाईल.’ दादा एखाद्या इमारतीची पाहणी करत असतात त्यावेळी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे असते, ते दादांच्या सौंदर्यदृष्टीचे द्योतक आहे, असे मला वाटते. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत दादांचा सिंहाचा वाटा आहे. शहरावर जिवापाड प्रेम आहे. पिंपरी-चिंचवडबाबत एखादा प्रकल्प येतो, त्यावेळी पोटच्या पोराकडे आपुलकीने बघावे, तसे त्या शहराविषयी वात्सल्य, त्या शहराविषयी ममत्व हे दादांच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर दादांच्या विकासाच्या दृष्टीची साक्ष प्रत्येकाला पटते. दादांची दूरदृष्टी, विकासाची दृष्टी आणि त्याचबरोबर सौंदर्यदृष्टी याचा ठायी ठायी प्रत्यय येतो. राजकीय नेतृत्व म्हणून दादा नव्या तंत्रज्ञानाच्या फार पुढे गेले आहेत. मीडियाची फारशी फिकीर करीत नाहीत. कार्यकर्ता म्हणून असे वाटते दादांनी मीडियाशी इन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. त्याचा तरुणांना फायदा होईल. दादांविषयी लोकांच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर होतील. त्यांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे. ते म्हणतात, `माझे काम बोलेल, मी बोलणार नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही.’
आरोग्याबाबत जागरूक
दादा खूप हेल्थ कॉन्शिअस आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो, एवढ्या व्यग्रतेत ते हे कसे करू शकतात. जेवणं वेळेवर व्हावीत, यावर दादांचा कायम कटाक्ष असायचा. दादांना मांसाहाराची आवड आहे. ते तितकेच आवडीने खिलवतात. सकाळी लवकर उठणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. दादांचा फिटनेस अफाट आहे. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान ते माहूरगड न थांबता चढले. त्यानंतर मी दादांकडे पाहिल्यावर त्यांनी फक्त स्माइल दिले. त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘युवर एज इज जस्ट नंबर.’ दादांचे हसणे आणि दादांना विनोद हा खूप वेगळा भाग आहे. साहेबांचा विनोद हा बोचरा आहे, परंतु दादांचा विनोद ओरखडे काढणारा आहे. ते विरोधकाला सहज नामोहरण करतात. मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे अनेकदा गैरसमजुतींचे वादळ निर्माण होते. त्यांच्याविषयी वावड्या तयार केल्या जातात. त्याला दादा सोईस्करपणे उत्तर देतात. मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत छोटे वृक्ष वाढत नाहीत. परंतु आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचे सावली देणारे डेरेदार झाड दादांच्या रूपाने नक्की वाढले आहे.