जमीर काझी : मुंबई : निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेमध्ये मध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यातून १ कोटी ८० लाख लोकांचा सर्व्हे अजुन राहिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची भीती आहे., अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी व्यक्त केली. (Rohit Pawar meets election officials)
लोकसभा निवडणुकीत फॉर्म ६ च्या माध्यमातून मतदार वाढले
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, याबाबत निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आम्ही मांडणार आहोत. फॉर्म ६ हा जो आहे, तो रेग्यूलर फॉर्म असतोच. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा महाराष्ट्रात लाखो मतदार वाढले होते. फॉर्म ६ च्या माध्यमातून अचानक वाढले अन् अचानक डिलिट सुद्धा झाले. त्यावर आम्ही सादरीकरण देखील केले होते, तो मुद्दा आम्ही मांडला होता.
फॉर्म ६ वर आक्षेप
एकाच खोलीमध्ये हजार लोक राहतात असे तिथे दाखवण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर त्यातील एकही मतदार सापडला नाही, फॉर्म ६ चा वापर करून, निवडणुकीच्या आधी अनधिकृतपणे मतदार वाढवले जातात. त्यामुळेच आमचा फॉर्म ६ वर आक्षेप आहे, असे सांगून ते म्हणाले की, ते फॉर्म ६ चा वापर करून निवडणूक आयोग मतदारांच्या नोंदी कशा करणार हे आम्ही समजून घेणार आहोत. विधानसभा, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी असताना एवढा खटाटोप कशासाठी? खरं तर बीएलओंनी मतदारांच्या घरी तीन वेळा गेले पाहिजे. परंतु, ते एकदाही जात नाहीयेत,तर, एवढ्याच दिवसात ही प्रक्रिया झाली पाहिजे, तेवढ्याच दिवसांमध्ये झाली पाहिजे. टार्गेट दिल्यामुळे हे बिएलओ त्यामध्ये नको ती कामे करत आहेत. हे लोकशाहीला धोकादायक होऊ शकते. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे, तो देखील जाऊ शकतो. (Rohit Pawar meets election officials)
भाजपच्या कार्यक्रमात वंदे मातरम् चुकीच्या पद्धतीने सादर
आमदार रोहित पवार म्हणाले की, हायकोर्टच्या टायपिंग परीक्षेतील सॉफ्टवेअर बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलन योग्यच आहे. सरकारने पुन्हा परीक्षा घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. राजस्थानमधील भाजपच्या कार्यक्रमात तिरंगा उलटा लावण्यात आला आणि ‘वंदे मातरम्’ही चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. या प्रकाराबद्दल भाजपने आधी माफी मागावी आणि नंतर देशभक्ती बद्दल इतरांना ज्ञान द्यावे, असे रोहित पवार म्हणाले.
.. तर अमित शाह, राजनाथ सिंह अपयशी
महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर येत असतील, तर गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे अपयश आहे.२०१४ पासून देशात भाजपाचे सरकार आहे. मग केंद्रीय गृह मंत्रालय, संरक्षण यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत? बांगलादेशी घुसखोरी रोखण्यात सरकार अपयशी ठरत असेल, तर त्याची जबाबदारी केंद्रातील सत्ताधाऱ्यांचीच आहे.असा टोलाही त्यांनी लगावला. (Rohit Pawar meets election officials)