नवी दिल्ली : देशाला सध्या मध्ययुगीन काळाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) केली. (Rahul attacks Shah)
गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या तीन विधेयकांवर गांधी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘भाजपने मांडलेल्या नवीन विधेयकाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. आपण मध्ययुगीन काळात परत जात आहोत. त्या काळात राजा कोणालाही मनाप्रमाणे काढून टाकू शकत होता. निवडून आलेली व्यक्ती म्हणजे काय याची कसलीही संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहरा आवडत नाही, म्हणून तो ईडीला खटला दाखल करण्यास सांगतो आणि नंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेली व्यक्ती ३० दिवसांच्या आत काढून टाकली जाते. तसेच, आपण नवीन उपराष्ट्रपती का निवडत आहोत हे विसरू नये. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो आणि मी म्हणालो, तुम्हाला माहिती आहे, जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते गेले…’’(Rahul attacks Shah)
‘‘आम्ही सुदर्शन रेड्डींना पाठिंबा देत आहोत. मला विश्वास आहे की ते अत्यंत भक्कमपणे निवडणूक लढवतील. आणि आम्ही जो संदेश देऊ इच्छितो तो देशाला दिसेल,’’ असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.(Rahul attacks Shah)
‘‘संविधानावर हल्ला करणारे आणि संविधानाचे रक्षण करणाऱ्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. प्रत्येक पक्षाने एकमताने रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी तेलंगणाच्या जातीय जनगणनेवर काम केले. तेलंगणासाठी सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यास मदत केली. मी काय बोलावे याचा विचार करत असतानाच मी त्यांच्या खिशात पाहिले. त्यांच्या खिशात भारताचे संविधान होते. ते सर्वत्र भारताचे संविधान घेऊन जात आहेत. सुमारे पाच मिनिटांनंतर, ते मला म्हणाले, राहुल, मी गेल्या ५२ वर्षांपासून माझ्या खिशात संविधान घेऊन लोकांमध्ये जात आहे… ते म्हणाले, कारण कोणत्याही कायदेशीर संभाषणात, संविधानाकडे अंतिम उत्तर असते,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.