पुणे : प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. ४२ हजार कोटी रुपयांच्या कृषी योजनांतर्गत ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांचे १ हजार १०० पेक्षा अधिक प्रकलपांचा समावेश आहे. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील नऊ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’च्या दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषीमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांची उपस्थिती होती.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी सक्षम व्हावा यादृष्टीने काम करत आहे. यावर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यांनी त्या-त्या भागात दौरे करून शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी जाणून घेतल्या. या शेतकरी बांधवांना उभे केले पाहिजे यादृष्टीने राज्य शासनाने चांगले पॅकेज जाहीर केले आहे. (Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana)
राज्यात साडेतीन हजार कृषी सखी काम करत असून त्या स्वत: प्रशिक्षण घेऊन तेथील महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचा अभिमान असून कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सुरू केलेल्या मोठ्या योजनेची माहिती घेऊन सेंद्रीय शेतीमधील तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी कृषी सखींनी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचे मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे. चना, मूग, तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढविण्यात येणार असून भारत आत्मनिर्भर बनणार आहे. कडधान्याच्या शेतीसाठी खतांचा वापर कमी होत असल्यामुळे नैसर्गिक शेती आणि कडधान्य शेती एकमेकांना पूरक बाबी असल्याने त्याचा जमीनीचा पोत वाढण्यासाठी फायदा होतो. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रीय खताचा वापर करावा, असे आवाहनही मंत्री भरणे यांनी केले. (Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana)
कृषी आयुक्त मांढरे म्हणाले, आपले उत्पादन दुप्पट करण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र उत्पन्न दुप्पट न होता उत्पादित पिकाला योग्य बाजारभाव कमी मिळत असल्याने कमी झाले आहे. त्यासाठी उत्पादित कृषीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मालाचा बाजारभाव स्वत: कसा ठरविता येईल यासाठी व्यापारी पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध विभांगाच्या समन्वयाने काम होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
श्री. आवटे यांनी प्रास्ताविकात या योजनेंतर्गत राज्यातील ९ जिल्ह्यात पाच वर्षाचा आराखडा करून कृषी विकासाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभासाठी सर्वाधिक ४३ लाख १५ हजार शेतकऱ्यांची निवड केल्याची माहिती देण्यात आली.
.
‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’त राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश
‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’त कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे. (Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana)