नवी दिल्ली : उत्तराखंडमधील परीक्षा फुटी प्रकरणांवरून वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर नव्याने हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर “पेपर चोर” असल्याचा आरोप केला आहे. (Paper chor)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडणूक घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याला त्यांनी “व्होट चोरी” म्हटले होते.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये गांधींनी म्हटले आहे, ‘‘आज भाजपचे दुसरे नाव आहे – पेपर चोर! देशभरात वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे लाखो कष्टकरी तरुणांचे जीवन आणि स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत.’’ (Paper chor)
उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांच्या निषेधाचा व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले की, उत्तराखंड सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन कमिशन (UKSSSC) च्या पेपर लीकमध्ये नुकतीच झालेली घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे प्रतिबिंब आहे.
“उत्तराखंडमधील UKSSSC पेपर लीक हे त्याचे नवीन उदाहरण आहे. लाखो तरुणांनी दिवसरात्र कष्ट केले, परंतु भाजपने चोरी करून त्यांचे सर्व कष्ट वाया घालवले आहेत,” असे ते पुढे म्हणाले. (Paper chor)
हरिद्वारमधील एका परीक्षेनंतर UKSSSC प्रश्नपत्रिकेची तीन पाने ऑनलाइन समोर आली होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नंतर पोलिसांनी खालिद मलिकला अटक केली. त्याने त्याच्या मोज्यांमध्ये मोबाईल लपवला होता, वॉशरूममध्ये जाऊन त्याने पेपरचे फोटो काढले होते आणि ते व्हायरल केले होते.