मुंबई : विशेष प्रतिनिधी : उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद अत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या खासदारांशी साधणार आहे, असे उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार व सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Justice Reddy met Pawar)
रेड्डी यांनी यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे, तसेच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस खासदारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी तिन्ही ठिकाणी संबंधित नेत्यांसह स्वतंत्रपणे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Justice Reddy met Pawar)
पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की, इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन. या निवडणुकीत व्हीप नसतो, गुप्त मतदान असते, त्यामुळे माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करावे, अशी सर्वपक्षीय खासदारांनी विनंती करतो, असेही रेड्डी म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, आघाडीच्या उमेदवाराला तीनशे खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार नाही. लोकप्रतिनिधी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान केल्यास इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चितच विजयी होतील. (Justice Reddy met Pawar)
उद्धव ठाकरे म्हणाले की, देश सद्या विशिष्ट संक्रमण अवस्थेतून जात असताना घटनात्मक पदावर योग्य उमेदवार असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फोन करणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज देश संकटात असताना लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही लोकशाहीचा जागर आहे. देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहता निकाल चमत्कारिक असू शकतात. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खा. वर्षा गायकवाड, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शोभा बच्छाव, राज्यसभा सदस्य डॅा. नासिर हुसेन, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदी उपस्थित होते.