नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. याची अंमलबजावणी तत्काळ सुरूही झाली आहे. या निर्णयानुसार, दोन्ही बाजूंनी जमिनीवरून हवेतून अथवा सागरी मार्गाने होणारे हल्ले थांबवण्यावर सहमती दर्शवल्याचे मिस्री यांनी सांगितले. (India Pakistan ceasefire)
पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी शनिवारी (१० मे रोजी) दुपारी भारतीय लष्करी कारवाई महासंचालकांशी फोनवर संपर्क साधला आणि दोन्ही बाजूंनी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता गोळीबार थांबवण्यावर सहमती दर्शवली.
दरम्यान, दोन्ही देश १२ मे रोजी पुन्हा चर्चा करतील.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश ‘‘जमिनी, हवाई आणि सागरी मार्गाने होणारे गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील.’’ (India Pakistan ceasefire)
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात : ‘‘शांतीचा मार्ग निवडण्यात पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी शहाणपणा दाखवला. याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो’’
दरम्यान, पाकिस्तानने २६ भारतीय ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी पहाटे भारताने पाकिस्तानमधील आठ हवाई तळांवर हल्ले केले.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी क्षेत्रांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने शनिवारी (१० मे) पाकिस्तानमधील आठ लष्करी ठिकाणांवर हल्ला केला. ज्यामध्ये रडार युनिट्स आणि दारूगोळा डंपचा समावेश होता. शिवाय, केंद्र सरकारने शनिवारी भारताची एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचे आणि सिरसा आणि सुरतमधील हवाई तळांना नुकसान पोहोचवल्याचे पाकिस्तानचे ‘‘खोटे’’ दावे पूर्णपणे फेटाळून लावले.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की भारताने २६ हून अधिक ठिकाणी घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निष्प्रभ केला. त्या म्हणाल्या की पाकिस्तानी सैन्य वारंवार पश्चिम सीमेवर हल्ले करत आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे आणि लढाऊ विमाने वापरत आहेत.
हेही वाचा :
दहशतवादी कृत्ये यापुढे देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील
मारले गेलेल्या दहशतवाद्यांत मसूद अझहरचे नातेवाईकही