लंडन : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर तातडीने मायदेशी परतले आहेत. कौटुंबिक कारणामुळे गंभीर भारतात परतल्याचे संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ते पुन्हा इंग्लंडला कधी रवाना होतील, याबाबत मात्र अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Gambhir)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून सुरू होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) नव्या चक्राची सुरुवात या मालिकेने होणार आहे. या मालिकेपूर्वी, १३ ते १६ जूनदरम्यान भारत आणि सध्या इंग्लंडमध्येच असणारा भारत अ या संघामध्ये सराव सामना रंगणार आहे. या सराव सामन्यास गंभीर अनुपस्थित असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सितांशू कोटक, मॉर्ने मॉर्केल आणि रायन टेन डॉएश्ट हे सहायक प्रशिक्षक भारतीय संघाला मार्गदर्शन करतील. (Gambhir)
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ या मालिकेत नव्या फलंदाजी क्रमासह उतरेल. त्यादृष्टीने भारतासाठी हा सराव सामना महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या बी. साई सुदर्शनला रोहितच्या जागी, तर करुण नायरला विराटच्या जागी मधल्या फळीत संधी देण्यात येईल, असे समजते. नुकत्याच झालेल्या भारत अ संघाच्या अनौपचारिक दोन कसोटींमध्ये मिळून करुणने एका द्विशतकासह २५९ धावा फटकावल्या होत्या. यशस्वी जैस्वालसोबत लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. (Gambhir)
अंतिम संघात नितीशकुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूर यांपैकी कोणत्या अष्टपैलूला स्थान द्यावे, हा प्रश्नही भारतीय संघास सोडवावा लागणार आहे. वेगवान गोलंदाजीसाठी बुमराहचे संघातील स्थान निश्चित असून अर्शदीप सिंग, महंमद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांपैकी दोघांची निवड करण्यात येईल.
हेही वाचा :
सिफत कौरचा ब्राँझवेध