सांगली : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जनतेच्या हितासाठी नसून देवदेवतांच्या नावाखाली अदानींचा विकास करण्यासाठी राज्यातील कोट्यावधी जनतेवर हजारो कोटी रुपयांच्या कराचा व १२ जिल्ह्यामधील हजारो एकर सुपीक जमीनी पिकविणा-या शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग होवू देणार नसल्याची भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरील काढण्यात आलेल्या शक्तीपीठ विरोधी मोर्चा दरम्यान मांडली.
गेल्या दोन दिवसापासून राज्य सरकारने सुधारीत शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी पोलिसांना हाताशी धरून शेतकरी , महिला यांना रात्री अपरात्री अटक करून दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीसह राज्यातील विविध भागात गेली दोन दिवस शेतकरी या महामार्गास कडाडून विरोध करू लागला आहे.सुरवीतीस देवांच्या नावाखाली मार्ग करण्यात आला मात्र आता शेतक-यांचा विरोध होवू लागल्यावर सोईनुसार बदलला जावू लागला आहे.
रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग सध्या अस्तित्वात असून तो तोट्यात चाललेला असून या महामार्गाला समातंर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जात आहे. राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर असताना राज्यातील कंत्राटी कामगारांचे पगार थकीत आहेत. ठेकेदारांची ८० हजार कोटींची देणी आहेत. जलजीवन योजनेतील हजारो कोटींची देणी थकीत आहेत. कृषी विभागातील यांत्रिकीकरण व अन्य विभागांची अनुदाने प्रलंबित आहेत असे असताना राज्यातील जनतेवर एक लाख कोटींचा कर्जाचा बोजा टाकून या महामार्गाची उभारणी कशासाठी? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.