कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न आधीपासून सुरू आहेत. त्याला ब-यापैकी यश येत असल्याचे दिसत आहे. अलीकडच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांची राजकीय ताकद कमी झालीच आहे, परंतु खुद्द त्यांच्या कागल तालुक्यातूनच त्यांना दिले जाणारे आव्हान त्यांच्यासाठी धक्कादायक आणि धोकादायक मानले जाते.
विजय चोरमारे
मंडलिक-महाडिक संघर्ष
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खासदार सदाशिवराव मंडलिक विरुद्ध आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालला. मंडलिक हे मास लीडर. तर महाडिक हे लोकप्रतिनिधींची मोट बांधून त्यांच्या बळावर राजकारण करणारे नेते. या संघर्षात मंडलिक यांचे सेनापती म्हणून मुश्रीफ यांनीच आघाडीवर राहून काम केले. पुढे मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यातच वितुष्ट आले. (Setbacks to Mushrif’s political dominance)
मुश्रीफ-कोरे युती
कोल्हापूर महापालिकेवर दीर्घकाळ महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होते. तिथेही त्यांची पद्धत ठरलेली होती. निवडून आलेले नगरसेवक गोळा करायचे आणि त्यांची ताराराणी आघाडी उभी करायची. महाडिक यांच्यासोबत राहिल्यावर सत्तेतली पदे मिळतात म्हणून नगरसेवकही त्यांच्यासोबत जात होते. महाडिकांच्या दावणीला बांधलेले नगरसेवक म्हणून लोकांकडून हेटाळणी झाली तरी त्याची पर्वा कुणी करीत नव्हते. महाडिकांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे एकत्र आले. त्यांनी महाडिक यांचे महापालिकेवरचे वर्चस्व संपवले. सत्तेसोबत राहणारे महाडिक काळाच्या ओघात भाजपसोबत गेले. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी महापालिकेत आघाडी केली आणि कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळवली. या दोघांनी मिळून गोकुळ दूध संघावरची महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली.
केंद्रीय यंत्रणांकडून लक्ष्य
२०१४ नंतरच्या काळात कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. ते त्यांनी नाकारल्यावर मुश्रीफांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडल्या. भाजप नेते किरीट सोमय्या हात धुवून त्यांच्यामागे लागले. प्रकरण ईडीपर्यंत पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील डझनभर नेते ईडीच्या रडारवर होते. कोणत्याही क्षणी तुरुंगात जातील अशी स्थिती होती. परंतु अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाऊन ही कारवाई टाळली. त्यातून मुश्रीफही सुरक्षित झाले. (Setbacks to Mushrif’s political dominance)
पालकमंत्रीपदातही मुश्रीफांना शह
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळवून मुश्रीफ यांना शह दिला. आणि आता महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आमदारांच्या संख्याबळावर पालकमंत्रिपद शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांच्याकडे गेले. तोही मुश्रीफ यांना मोठा धक्का होता. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय मुश्रीफ यांना पचनी पडलेला नाही. त्यामुळे सातत्याने ते नवख्या प्रकाश आबिटकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांवर दबाव आणून त्यांना नगरपालिका निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत आघाडी करायला भाग पाडले. त्यामुळे कागलच्या राजकारणात समरजित घाटगे त्यांच्या बरोबरीला आले.
चौदा जागांवर बोळवण, चार जागांवर विजय
कोल्हापूर महापालिकेवर दीर्घकाळ मुश्रीफ यांचे वर्चस्व होते. परंतु यावेळच्या निवडणुकीत भाजपने त्यांना अक्षरशः बाजूला फेकले. ८१ सदस्यांच्या महापालिकेत फक्त चौदा जागा मुश्रीफ यांच्या पक्षासाठ सोडण्यात आल्या. त्या त्यांना कोणतीही खळखळ न करता स्वीकाराव्या लागल्या. प्रत्यक्ष निकालानंतर त्यांच्या अवघ्या चार जागाच निवडून आल्या. अशा रितीने भाजपने मुश्रीफांचे कोल्हापूर महापालिकेती अस्तित्व जवळपास संपुष्टात आणले. याउलट मुश्रीफ यांचे एकेकाळचे सहकारी सतेज पाटील यांनी एकट्याच्या बळावर ३५ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले.कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणावरील पकड ही प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकडीचा महत्त्वाचा भाग असते. परंतु आता तिथे मुश्रीफ यांचे फक्त चार नगरसेवक आहेत. (Setbacks to Mushrif’s political dominance)
शीतल फराकटे यांची बंडखोरी
कागलच्या राजकारणात मुश्रीफांचा शब्द अंतिम मानला जायचा. आता तिथे त्यांच्या जोडीला समरजितसिंह घाटगे आल्यामुळे सामुदायिक निर्णयप्रक्रिया आली आहे. आपल्यासाठी लढलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही, अशी मुश्रीफांची स्थिती झाली आहे. मुश्रीफ यांच्या सगळ्या सभा अलीकडच्या काळात शीतल फराकटे ही तरुण कार्यकर्ती गाजवत होती. कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रियांच्यातले एक समर्थ नेतृत्व म्हणून त्यांचा बोलबाला होता. त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द मुश्रीफ यांनी दीड वर्षांपूर्वी दिला होता, असा दावा शीतल फराकटे यांनी केला आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे एका छोट्या गावचे सरपंचपद भूषवलेल्या या तरुण कार्यकर्तीने बंडाचे निशाण फडकावले. तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या ताकदवान नेत्याविरोधात, एका मंत्र्याविरोधात त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. मुश्रीफ यांना हा मोठा धक्का मानला जातो. शीतल फराकटे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्यामागे ताकद उभी केली आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागेल, परंतु एका सामान्य कार्यकर्तीने मुश्रीफांना दिलेले आव्हान सध्या जिल्ह्यातील चर्चेचा विषय आहे.
राधानगरीतूनही आव्हान
एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय, राधानगरी तालुक्यातही मुश्रीफांच्या समर्थकांनी त्यांच्या निर्णयाविरोधात बंडाचे निशाण फडकावले. मुश्रीफ यांनी आगामी गोकुळच्या निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन दिलेल्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्याची दखल न घेता मुश्रीफ यांनी आपला निर्णय कायम ठेवल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मुश्रीफांना आव्हान दिले.
जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांना असे एकामागून एक धक्के बसत आहेत. अर्थात मुश्रीफ हे मुत्सद्दी नेते आहेत. सध्या ते मंत्रिपदावर आहेत आणि तूर्तास त्याला धोका नाही. त्यामुळे आगामी काळात सहकारी संस्थांवरील वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांची गणिते सुरू आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते, हे पाहावे लागणार आहे.