मुंबई : विशेष प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जाहिरातबाजीपासून दूर राहून त्यांना भरीव मदत करा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी (२४ सप्टेंबर) पत्र लिहून ही मागणी केली आहे. शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपयांची मदत करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. (Raj Thackrey’s appeal)
गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूरग्रस्त भागात पाहणी करून मदत करण्याचे आश्वासन देत आहेत. (Raj Thackrey’s appeal)
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील पूर परिस्थिती व शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे.कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे सरकारने कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचे पॅकेज केंद्राकडून मिळवावे. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच. त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. त्यासाठी दिल्लीचा पाठपुरावा करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे, असा टोलाही लगावला आहे. (Raj Thackrey’s appeal)
अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचचे शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तत्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करून अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच, असा इशाराही दिला आहे.
कर्जमाफी जाहीर करा : आदित्य ठाकरे
राज ठाकरे यांच्यापाठोपाठ युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.
भाजप, शिंदे गटाचे खासदार-आमदारांचे महिन्याचे वेतन
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सत्ताधारी महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या राज्यातील सर्व खासदार व आमदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचे जाहीर केले आहे. (Raj Thackrey’s appeal) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजपा-महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व भाजपा खासदार व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.