नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Sharad pawar warns Govt)
एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
‘‘शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टींनी पिडित बळीराजाला तात्काळ मदत व सातबारा कोरा करणे आवश्यक आहे,’’ असे मत पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. शेतकरी मोर्चा ही केवळ सुरूवात आहे, सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Sharad pawar warns Govt)
ते म्हणाले, “राज्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. मात्र, शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संकटकाळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.”
पवार यांनी यावेळी स्वत: केंद्रीय कृषी मंत्री असताना केलेल्या कर्जमाफीचा पुनरुच्चारही केला.
ते म्हणाले, “नाशिकचा कांदा जगात जातो. मात्र कांद्याला दर नाही. कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. मात्र, केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? यावर उत्तर शोधायचं असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. असे चित्र असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही”, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.