Home » Blog » Congress criticizes RSS: …हा भारताच्या आत्म्यावर घाव : काँग्रेस

Congress criticizes RSS: …हा भारताच्या आत्म्यावर घाव : काँग्रेस

by प्रतिनिधी
0 comments
Congress criticizes RSS

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर हल्ला करून मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा  केवळ पुतळ्यावर नाही, तर  देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे, असा हल्लाबोल  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (७ जून) केला. (Congress criticizes RSS)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्यावर कोयत्याने वार करून त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध करून सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे नेते नाहीत, तर ते भारताच्या नैतिक अधिष्ठानाचे शिल्पकार आहेत. गांधीजींनी दिलेली सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये भारतीय लोकशाहीच्या मुळाशी आहेत. सहजीवन आणि धार्मिक सलोखा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गांधीविचार फक्त देशातच नाही तर संपूर्ण विश्वात मानले आणि आचरणात आणले जातात. जगातील बहुतांश देशात त्यांचे पुतळे उभारले आहेत. संपूर्ण विश्व गांधी विचारातून प्रेरणा घेते. (Congress criticizes RSS)
संविधान न मानणारे कट्टर विचारसरणीचे काही लोक आणि संघटना मात्र महात्मा गांधीजींचा द्वेष करतात. याच द्वेषातून गांधीजींची हत्या करण्यात आली होती. २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून या अपप्रवृत्तींना मोठ्या प्रमाणात बळ आणि पाठिंबा मिळू लागला. सरकारी छत्रछायेत या टोळक्यांनी महात्मा गांधीबद्दल अपप्रचार आणि गोडसेंचे उदात्तीकरण सुरु केले. यातून सूरज शुक्लासारखे अनेक विखारी तयार झाले आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत कारवाई करावी, जेणेकरून ही पिलावळ पुन्हा अशी हिंमत करणार नाही. गांधीजींची हत्या करून यांना गांधीविचार संपवता आला नाही पुतळ्यावर कोयत्याने वार करून गांधीविचार संपणार नाही. गोडसेविचार हा विनाशाचा मार्ग असल्याचे सपकाळ म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!