नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या काळात सध्या देशात अघोषित आणीबाणीच सुरू आहे. मोदी सरकारचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठीच आणीबाणीचा मुद्दा सातत्याने पुढे आणला जातो. संविधान हत्येचे ‘नाटक’ रंगवण्यात येते, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी (२५ जून) केला. (Kharge slams Modi Govt)
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला खरगे यांनी तितकेच तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि जे बंधुता आणि स्वातंत्र्य वृद्धिंगत होऊ देत नाही, त्यांना इतरांना व्याख्यान देण्याचा अधिकार नाही. (Kharge slams Modi Govt)
काँग्रेसच्या इंदिरा भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना खरगे यांनी भाजप-आरएसएसवर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी ‘‘देशाच्या स्वातंत्र्यात, संविधान तयार करण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारले’’ ते आणीबाणी लागू झाल्यानंतर ५० वर्षांनीही आणीबाणीच लादत आहेत. सध्या अघोषित आणीबाणीच आहे. तेच लोक आता संविधान वाचवण्याची भाषा करत आहेत, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना श्री. खरगे म्हणाले की, त्यांच्याच कारभारामुळे संविधान धोक्यात आहे. मोदी सरकारच्या काळात अभिव्यक्ती आणि मुक्त विहाराचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. (Kharge slams Modi Govt)
‘‘आणीबाणीचा काळ लोक विसरून गेले आहेत. आता त्यावर बोलण्याला अर्थ नाही. जे (भाजप-आरएसएस) संविधान बचाओबद्दल बोलत आहेत ते आता ५० वर्षांनंतर आणीबाणीबद्दल बोलत आहेत,’’ असे ते म्हणाले.
श्री. खरगे म्हणाले की, भाजप-आरएसएसने संविधान नाकारले होते आणि म्हटले होते की त्यात मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे आपले सांस्कृतिक पैलू नाहीत. आता याच लोकांना (भाजप-आरएसएस) अचानक उपरती झाली आहे.
काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेने भाजप अस्वस्थ झाला आहे. म्हणूनच ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणीचा मुद्दा उपस्थित करत आहे. सरकार आणीबाणीच्या वर्धापन दिनाला संविधान हत्या दिवस किंवा संविधान हत्या दिन म्हणून साजरे करत आहे, असे खरगे म्हणाले.
‘‘मोदी सरकार प्रशासनात अपयशी ठरले आहे. आणि त्यांचे अपयश इतके आहे की लोक महागाईबद्दल चिंतेत आहेत, सरकारकडे बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक अपयशावर कोणतेही उत्तर नाही. त्यांचा हा खोटेपणा आणि अपयश लपवण्यासाठी त्यांनी हे नाटक केले आहे,’’ असा आरोपही खरगे यांनी केला.
ते म्हणाले की आर्थिक असमानता इतकी वाढली आहे की ती भरून काढता येत नाही. ‘‘तुम्ही अघोषित आणीबाणी आणली आहे,’’ या सरकारला मणिपूरमधील परिस्थितीही हाताळता आलेली नाही, अशी टीकाही खरगे यांनी केली.
हेही वाचा :
आणीबाणी हा सर्वांत काळा अध्याय : मोदी
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारवाढ ही मतचोरीच : काँग्रेस