नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या शस्त्रास्त्रांच्या धुमश्चक्रीत पाकचे ३५-४० सैनिक ठार झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर रविवारी भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. (Pak Soldiers Killed)
या परिषदेस लष्करातर्फे घई, हवाई दलातर्फे ए. के. भारती आणि नौदलातर्फे ए. एन. प्रमोद यांनी पत्रकारांना संबोधित केले. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानने सातत्याने भारतावर ड्रोनचा, तसेच अन्य शस्त्रांस्त्रांचा मारा केला. भारतानेही त्याला हवाई संरक्षण प्रणालीद्वारे (एअर डिफेन्स सिस्टिम) चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे किमान ३५ ते ४० सैनिक ठार झाले, असे घई म्हणाले. भारताने ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी टिपण्यात आले, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. (Pak Soldiers Killed)
एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची घुसखोरी यशस्वीपणे परतावून लावली आणि काही विमाने पाडली अशी माहिती दिली. पाकिस्तानच्या हवाई तळांवर लक्ष्य केंद्रीत करुन जिथे नुकसान होईल तिथे हल्ला करा असे आमची योजना अंमलात आणली. जलद हवाई हल्ल्यामध्ये पश्चिम आघाडीवरील पाकिस्तानचे हवाई तळ, कमांड सेंटर, लष्करी पायाभूत सुविधा आणि हवाई सरंक्षण प्रणालीवर हल्ला केला. चकलाला, रफिक, रहीम यार खान या तळांचा समावेश आहे. आक्रमकता सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत आम्ही सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद येथे हल्ले करण्यात आले. दहशतवादी छावण्याचे नष्ट करण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य केले आणि त्याचे परिणाम जगासमोर आणले. आमचे उद्दिष्ट साध्य करताना आमचे सर्व वैमानिक घरी परतले असल्याचेही त्यांनी सांगितले. (Pak Soldiers Killed)