मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहलगामध्ये हल्ला झाला तेव्हा रक्त आणि पाणी एकत्र सोबत वाहू शकत नाही, असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याबरोबर आता क्रिकेट मॅच कशी चालते? सीमेवर जवान शहीद होणार आणि इकडे क्रिकेट खेळत राहणार हा देशभक्तीचा व्यापार आणि थट्टा चालवली आहे, असा हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. (Uddhav’s jibe on Modi)
येत्या रविवारी शिवसेनेच्या महिला आघाडीकडून राज्यभर ‘माझा कुंकू माझा देश’ अभियान राबविण्यात येणार असून ‘हर घर सिंदूर’च्या पुड्या मोदींना पाठवल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दुबई येथे भारताचा पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना होणार आहे. त्याबाबत देशभरात त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१३ सप्टेंबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली.(Uddhav’s jibe on Modi)
या सामन्यावरून पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून हल्ला चढविताना ते म्हणाले, ‘‘जेव्हा भारताने हल्ला केला, तेव्हा असे वाटले की पाकिस्तानचे तुकडे होणार, ज्या पाकिस्तानसोबत युद्ध पुकारले होते. त्यांच्याबरोबर आता सामना खेळत आहोत. पहलगाम हल्लातील रक्तही अजूनही सुकलं नसताना ही मॅच कशासाठी खेळायची? भाजपाकडून हा देशभक्तीचा व्यापार आणि थट्टा सुरु आहे. जावेद मियाँदाद जेव्हा मातोश्रीवर आला होता, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला ठणाकावून सांगितले होते, की जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत क्रिकेट सामना होणार नाही. हेच आता केंद्र सरकारने पाकिस्तानला ठणकावून सांगायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’(Uddhav’s jibe on Modi)
१९८४ साली रशियाने ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता, मग भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला काय जातंय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हा त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं होतं, की तुमच्यासोबत क्रिकेट खेळले जाणार नाही. कारण तुमच्याकडून देशाच्या सीमेवर हल्ले केले जात आहेत, पण आताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या केवळ नावातच शंकर आहे, असा निशाणा ठाकरेंनी एस. जयशंकर यांच्यावर साधला. यांना देशभक्तीपेक्षा पैसा, जाहिरात आणि मॅचमधून येणारा पैसा महत्त्वाचा वाटतो, असे टीकास्त्रही सोडले.
जय शहांना देशद्रोही ठरवणार का?
भारत-पाकिस्तान मॅच म्हटले की, तिकिट विक्री मोठ्या प्रमाणात होते. पण या मॅचला म्हणावा तसा प्रतिसाद नाही. नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही ठरवला होता, मग उद्याच्या मॅचला अमित शहांचा मुलगा जय शहा गेला तर त्यांना देशद्रोही ठरवणार की नाही?, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, ‘जय शहांच्या हाती क्रिकेटच्या नाड्या आहेत. उद्याच्या मॅचला हरभजन सिंग, सौरव गांगुली यांनीही विरोध केला आहे. आज सरदार पटेल असायला हवे होते. मग पाकिस्तान जाग्यावर राहिला नसता. मी देशवासीयांना आवाहन करतो, की उद्याच्या मॅचवर बहिष्कार टाका. कोणीही टिव्हीवर मॅच बघू नका. भाजपावाले पैसे देऊनही मॅचसाठी लोकांना पाठवतील अशी टीका ठाकरेंनी भाजपावर केली. दरम्यान, खरे परराष्ट्र धोरण समजणे मोदींच्या क्षमतेपलीकडील आहे. जिन्नाच्या थडग्यावर डोके टेकवणाऱ्यांनी आम्हांला शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.