कोल्हापूर : प्रतिनिधी : मुघलमर्दिनी, रणरागिनी, कोल्हापूर संस्थान संस्थापिक महाराणी ताराराणी यांनी आपल्या आपल्या पराक्रम, बुध्दीचातुर्य आणि मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले, असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले. (Tara Rani defended Swarajya)
मेजर स्वाती महाडिक यांना ताराराणी पुरस्कार प्रदान
स्वराज्यरक्षिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्ष आणि स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ताराराणींच्या स्मृतींचा गौरव व्हावा या उद्देशान प्रथमच देण्यात येणारा मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिक (सातारा) यांना देण्यात आला. मानपत्र, कोल्हापूर फेटा, ताराराणींचा पुतळा आणि शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. मेजर जनरल एम.एन काशिद यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार देण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलवडे, कर्नल विजयसिंह गायकवाड, शिवाजीराव परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Tara Rani defended Swarajya)
महिलांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज यांनी ताराराणींच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला खरे स्वराज्य लाभल्याचे सांगतले. सत्काराला उत्तर देताना मेजर स्वाती महाडिक यांनी महिलांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत. आपले ध्येय गाठण्यासाठी सात्तत्य राखावे असा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यात येणारी संकटे पेलण्यासाठी मानसिक व शारिरिकदृष्ट्या महिलांनी तयार राहिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. (Tara Rani defended Swarajya)
सातारा आणि कोल्हापूर गादी एकीसाठी ताराराणींचे प्रयत्न
यावेळी सावंत यांनी महाराणी ‘ताराबाईं : एक अभ्यास’ या विषयावर मार्गदर्शन केले. ताराराणींचे पहिले चरित्र सन १९४०मध्ये रंगुबाई जाधव-भोसले यांनी लिहिले. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांनी ताराबाईकालीन कागदपत्रांवर संशोधन केले. त्यानंतर मात्र तब्बल ५० वर्षे ताराराणींचे कार्य झाकोळले गेले होते. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ग्रंथातून ताराराणींचा इतिहास जनमानसात पोहोचविला. ताराराणींनी कोल्हापूर व सातारा गादीच्या एकीसाठी महत्वाचे प्रयत्न केले होते. मात्र ही एकी होवू नये यासाठी सक्रिय असणाऱ्या लोकांकडून त्यांची सात्तत्याने बदनामी करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.
शाहिर मिलींद सावंत यांनी शाहिरी कवणासह बिगुल वादन केले. स्वागत जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी तर प्रास्ताविक राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सी.एम. गायकवाड व विजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन महिलाध्यक्षा शैलजा भोसले यांनी केले.
भारतीय सैन्यात हजारो मुस्लीम भारतीय सैन्यदलात मुस्लिम सैनिक नसल्याची खोटी माहिती सोशल मिडीयावरून सात्तत्याने प्रसारित केली जाते. वास्तविक एकट्या जम्मू-काश्मिरमधील एका बटालियनमध्ये हजारो मुस्लिम सैनिक देशरक्षणासाठी सज्ज आहेत. यामुळे सुज्ञ नागरिक व युवा पीढीने अशा खोट्या माहितीपासून सावध राहावे असे आवाहन कर्नल अमरसिंह सावंत यांनी केले.