मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१४ जुलै) विधानसभेत दिली. (MCOCA)
आ. विलास भुमरे यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आ. वरुण सरदेसाई यांनी मुंबई महानगरात वाढलेल्या ड्रग्ज तस्करीबद्दल विस्तृत माहिती दिली. वांद्रे, बेहरामपाडा या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील युवक याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची तसेच ड्रग्ज पेडलर हे कायद्याने सज्ञान नसल्याने त्यांना शिक्षा होत नसल्याने त्याबाबत वयाचे निकष बदलण्याची मागणी केली.
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सध्या एनडीपीएस अंतर्गत सर्व गुन्ह्यांमध्ये मोक्का लावणे शक्य होत नाही. मात्र या सभागृहाने मंजुरी दिलेली असून, वरील सभागृहातही एक ते दोन दिवसांत मान्यता मिळेल. त्यानंतर वारंवार अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करता येणार आहे.(MCOCA)
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई सुरु आहे, अँटी-नार्कोटिक्स युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून कारवाया गतिमान झाल्या असून, विशेषतः शाळा संपर्क अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.(MCOCA)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमली पदार्थ विक्री प्रकरणांमध्ये अनेकदा आरोपी आपले वय कमी असल्याचे दाखवतात. याचा गैरफायदा रोखण्यासाठी व कायद्याच्या ‘कमी वयाच्या अज्ञान’ नियमात सुधारणा करून, जसे बलात्कार प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेतला जातो, तसेच पद्धतीने दोषींचे वय दोन वर्षांनी खाली आणण्याबाबत विचार सुरू आहे. राज्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध विशेष मोहीमा, ड्रग्ज मुक्त अभियान सुरू आहे. नार्को को ऑर्डीनेशन यंत्रणेची पुनर्रचना करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
हेही वाचा :
पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने संतापाची लाट