कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठवाड्यात मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, अधिकारी बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त भागात दौऱ्या करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूण घेतल्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिले आहे. संभाजीनगर येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांनी घेराव घातल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या गुरुवारपासून पुरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. (Marathwada)
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे हजारो हेक्टर शेती वाहून गेली आहे. राज्य सरकारने २१०० कोटीहून अधिक रक्कम नुकसानभरपाईपोटी देण्याची घोषणा केली आहे. तसेच सर्व मंत्र्यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा करावा असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळपासून मंत्र्याचे दौरे सुरू झाले आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सातच्या ठोक्याला सोलापूर जिल्याच्या दौऱ्याला सुरूवात केली. मुख्यमंत्री लातूर दौरही करणार आहेत. अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या संगोबा गावची पाहणी केली. त्यानंतर ते सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामध्यील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पाहणी केली. सरकार आपल्या पाठीशी राहील असे त्यांनी आश्वस्त केले. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यात पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकेजचे वाटपही करण्यात आले. त्यांच्यासोबत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक होते. (Marathwada)
मंत्री पंकजा मुंडे जालना आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे संभाजीनगरातील बदनापूर तालुक्यात असलेल्या सोमठाणा गावात कृषिमंत्री भरणे पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत नुकसानीचा पाढा वाचून दाखवला. भरणेंनी या गावातील बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. भरणे बांधावर पोहोचताच या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचत आज मंत्री आले म्हणून अधिकारी सुद्धा सकाळी नऊ वाजताच गावात आल्याचे सांगितले. आमच्या गावात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे, तरी सुद्धा आमच्या जिल्ह्याला नुकसानभरपाईतून वगळण्यात आले. आमच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, पण जिल्हाधिकारी आमच्या शेतीचे नंतर पंचनामे करा आणि फळबागांचे पंचनामे करू नका, असे सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली. (Marathwada)
शेतकऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या व्यथा ऐकल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी अधिकाऱ्यांना फोन लावत एक गुंठा जमीन जरी पंचनाम्याशिवाय राहिली तरी त्याला तुम्ही अधिकारी जबाबदार राहणार, असा इशारा दिला. कृषी विभागातील अधिकारी, महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन एकही पंचनामा शिल्लक ठेवू नका, सर्व पंचनामे नीट करा, असे आदेशच तत्कळा भरणेंकडून देण्यात आले. सगळ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. ज्यांचे पशुधन वाहून गेलेला आहे त्यांना देखील नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासनही यावेळी भरणेंकडून देण्यता आले आहे.