नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देहुली येथे झालेल्या दलित हत्याकांड प्रकरणातील तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १९८१ मध्ये हे हत्याकांड झाले होते. यात दलित समाजातील २४ जणांची हत्या करण्यात आली होती. कप्तान सिंग, रामसेवक आणि रामपाल सिंग अशी फाशी झालेल्यांची नावे आहेत. (Dehuli massacre)
गेल्या आठवड्यात, उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने १९८१ मध्ये देहुली येथे घडलेल्या या हत्याकांडातील तीन जणांना दोषी ठरवले. या दरोडेखोरांच्या टोळीने महिला, सहा महिने आणि दोन वर्षांच्या दोन मुलांसह २४ दलितांची हत्या केली होती.
तत्कालीन मैनपुरी जिल्हा आणि आताच्या फिरोजाबादमध्ये असलेल्या देहुली येथील दलित साक्षीदारांनी उच्चवर्णीय गुन्हेगारांविरूद्ध साक्ष दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी या हत्याकांडाचा कट रचण्यात आला होता. (Dehuli massacre)
१८ नोव्हेंबर १९८१ रोजी दुपारी ४.३० वाजता पोलिसांच्या गणवेशात आलेल्या १७ दरोडेखोरांच्या टोळीने देहुलीवर हल्ला केला. ठाकूर समाजातील राधेश्याम सिंग उर्फ राधे आणि संतोष सिंग उर्फ संतोषा हे यातील प्रमुख सूत्रधार होते. त्यांनी एका दलित कुटुंबाला लक्ष्य केले. त्यानंतर २४ जणांची हत्या केली.
घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार छोटेलालने (घटनेवेळी वय वर्षे १७) सांगितले, “मी माझ्या शेतात काम करत असताना मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या गोळीबारात जवालाप्रसाद पहिल्यांदा मारला गेला. त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. आमच्यापैकी बरेच जण जवळच्या जाजुमाई गावात पळून गेले.” (Dehuli massacre)
मूळ एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), ३०७ (खून करण्याचा प्रयत्न) आणि ३९६ (खून आणि दरोडा) या कलमांखाली १७ आरोपींची नावे आहेत. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात आरोपींपैकी १४ जणांचा मृत्यू झाला. कप्तान सिंग, रामसेवक आणि रामपाल सिंग या तिघांना मंगळवारी (१८ मार्च) दोषी ठरवण्यात आले.
रामसेवक मैनपुरी तुरुंगात होता. कप्तानला जामीन मिळाला होता. रामपालने कोर्टात हजर राहण्यापासून सूट मागितली, परंतु त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. (Dehuli massacre)
दुसरा आरोपी, ज्ञानचंद उर्फ गिन्ना याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याच्या प्रकरणात स्वतंत्र कार्यवाही सुरू आहे.
हेही वाचा :
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
मोदी गेल्या जन्मी शिवाजी महाराज होते