नवी दिल्ली : बिहारमध्ये गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रशासनाने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. हे असेच चात राहिले तर परिस्थिती भयावह होईल. किंबहुना, तशी झाली आहे. मला या सरकारला पाठिंबा दिल्याची लाज वाटते, अशा शब्दांत लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी शनिवारी २६ जुलै बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Chirag’s blunt criticism)
पासवान यांचा पक्ष एनडीएचा घटक आहे. वर्षअखेरीस बिहारमध्ये निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीमवर चिराग पासवान यांच्या स्पष्ट टीकेमुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ उडाली आहे.(Chirag’s blunt criticism)
पत्रकारांशी बोलताना चिराग यांनी बिहारमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘बिहारमधील गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण पाहता प्रशासनाने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकल्यासारखी परिस्थिती आहे. या घटनेचा निषेध करणे आवश्यक आहे, पण अशा घटना का घडत आहेत?, याचे मूळ शोधले पाहिजे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर परिस्थिती भयावह होईल, किंबहुना ती झाली आहे…’’
ते पुढे म्हणाले, ‘‘निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे असे घडत आहे, असा कुणी दावा करत असेल तर कदाचित तसे असू शकते. सरकारच्या बदनामीचे ते षड्यंत्र असू शकते, परंतु तरीही, त्यावर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. एकतर प्रशासनाशी संगनमत करून हा प्रकार सुरू आहे किंवा प्रशासन पूर्णपणे निरुपयोगी ठरले आहे. आता बिहार आणि बिहारींना सुरक्षित ठेवणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.’’(Chirag’s blunt criticism)
‘‘मी बिहार सरकारला या प्रकरणात वेळीच कारवाई करण्याची विनंती करतो. या सरकारच्या काळात गुन्हे नियंत्रणाबाहेर गेली आहे. अशा सरकारला मी पाठिंबा दिला आहे याची मला लाज वाटते,’’ असा संतापही चिराग पासवान यांनी व्यक्त केला.
बिहारात गुन्ह्यांची मालिकाच
बिहारमध्ये नुकतीच होमगार्ड भरती मोहीम झाली. गया जिल्ह्यात होमगार्ड भरती मोहिमेदरम्यान एका २६ वर्षीय महिलेवर चालत्या रुग्णवाहिकेत बलात्कार करण्यात आला होता. ही घटना २४ जुलै रोजी बोधगया येथे घडली. गेल्या महिन्याभरात झालेल्या अनेक हाय-प्रोफाइल हत्याकांडांनंतर पासवान यांनी हे वक्तव्य केले आहे. पाटण्याच्या पारस रुग्णालयात गँगस्टर चंदन मिश्राची हत्या, उद्योगपती गोपाल खेमका यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार आणि वाळू व्यापारी रमाकांत यादव आणि किराणा व्यापारी विक्रम झा यांची वेगवेगळ्या घटनांमध्ये हत्या करण्यात आली आहे.